अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर (संग्रहित फोटो)
अकोला : सध्या अकोला शहरात व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, अनेक ठिकाणी सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील अनेक खाजगी रुग्णांनी दवाखाने गजबजलेले दिसत आहेत. आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिका प्रशासनाकडून फवारणी आणि ब्लिचिंग पावडर टाकण्याची कारवाई केली जात आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्या शहरात मलेरियाचा एकही रुग्ण नसून डेंग्यूचे १० रुग्ण आढळले आहेत. तसेच मागील आठवड्यात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण होते. उपचारानंतर तिन्ही रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जलजन्य आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येतात. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी असून, गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत असून, व्हायरल फिव्हरसह सर्दी, पडसे, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका
शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव कमी असला तरी विविध भागांत फवारणी सुरू करण्यात आली आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या परिसरात विशेष खबरदारी घेतली जात आहे. दूषित पाण्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे. तसेच घरात पाण्याची साठवणूक केली जात असल्यास आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पिण्याचे पाणी गाळून-उकळून प्यावे
सध्या ग्रामीण भागात कसल्याही प्रकारचा जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव नसून नागरिकांनी तरीही नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे. नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. उघड्यावरील किंवा रस्त्यावरील थंड पेय टाळावे. घरात बनविलेले ताजे व गरम जेवण घ्यावे. स्ट्रीट फुड खाणे टाळावे. घराभोवती किंवा कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये.
डेंग्यू, चिकुनगुनियाचे वाढत आहेत रुग्ण
पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यानंतर वातावरणात होणाऱ्या बदलामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंग्यू, चिकुनगुनियासह इतर आजारांचे रुग्ण आढळत आहेत.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
सध्या जिल्ह्यात जलजन्य आजारांचा उद्रेक नसला तरी शहरी भागात डेंग्यूचे १० रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी आगामी काळात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, डायरिया आदी आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






