
आळंदी-पंढरपूर महामार्ग पथदिव्यांनी उजळणार; 20 किमी परिसराला टोल सवलत मात्र...
जेजुरी : केंद्र शासनाच्या वतीने राज्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र मार्गांपैकी आळंदी-पंढरपूर महामार्गावर लवकरच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पथदिवे उभारण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण महामार्ग प्रकाशमान होऊन भाविक व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः वारी व अन्य धार्मिक उत्सवांच्या काळात रात्रीच्या प्रवासासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
जेजुरी पंचक्रोशीतील तक्रारवाडी परिसरात उभारण्यात आलेल्या टोल नाक्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचक्रोशीतील सुमारे २० किलोमीटर परिसरातील स्थानिक रहिवाशांना पूर्ण टोलमाफी न देता विशेष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुरंदर तालुका उपसभापती निलेश जगताप यांच्या प्रकल्प कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली. या बैठकीस जेजुरी देवसंस्थानचे माजी अध्यक्ष शिवराज झगडे, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प ९६५ चे संजय कदम व अभिजित आवटे, बहुजन हक्क परिषद जेजुरीचे अध्यक्ष यशवंत दोडके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रमेश लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंचक्रोशीतील अनेक खेडी, वाड्या-वस्त्या या मार्गालगत असून स्थानिक नागरिकांची शेती, उद्योग-व्यवसाय व दैनंदिन कामांसाठी या मार्गावर सतत वर्दळ असते. जेजुरीजवळ तक्रारवाडी लगत उभारलेल्या टोल नाक्यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने यापूर्वी संबंधित लोकप्रतिनिधी, माजी विश्वस्त व भूमिपुत्र संघटनांकडून टोलमाफीसाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, पूर्ण टोलमाफीऐवजी सवलतीचा निर्णय जाहीर झाल्याने स्थानिक नागरिकांचा मोठा संभ्रम निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यां आणि जेजुरी भाजपा नेत्या अलका शिंदे यांनी सर्वत्र वीस किलोमीटर पंचक्रोशीत स्थानिकांना फ्री टोलनाका फ्री असताना हे सवलतीचे नाटक कशाला? असा सवाल खडा केला आहे.
यावर जेजुरीकर किंवा अन्य परिसरातील नागरिकांनी पास काढण्याचा किंवा साडेतीनशे भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामुळे आता तक्रार अशाप्रकारे जर स्थानिक नागरिकांची फसवणूक अथवा दिशाभूल केल्यास टोलनाक्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा अलका शिंदे यांनी दिला आहे. यामुळे तक्राररवाडीचा टोलनाका चांगलाच वादाच्या भोवऱ्यत अडकला आहे.