आंबेनळी घाट पुढील चार दिवस वाहतुकीसाठी बंद
महाबळेश्वर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील अत्यंत संवेदनशील आणि दरडप्रवण मानल्या जाणाऱ्या पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्ग (SH-१३९) वरील ‘आंबेनळी घाट‘ ३ जुलै २०२६ ते ६ जुलै २०२६ (एकूण ४ दिवस) सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी जाहीर केला आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला असून, या कालावधीत हलक्या वाहनांना देखील हवामानाच्या ऑरेंज व रेड अलर्टच्या वेळी पूर्णपणे बंदी असेल. तसेच रात्रीच्या वेळी या मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहतुकीला संपूर्ण बंदी असणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, तहसीलदार पोलादपूर आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी दिलेल्या अहवालानुसार, आंबेनळी घाटात तीव्र उतार, खोल दऱ्या आणि दरड कोसळण्याची तीव्र शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे घाटातील उतारांची स्थिरता कमी होऊन झाडे कोलमडणे, रस्ता खचणे, दाट धुके आणि पूरस्थिती निर्माण होणे यांसारखे गंभीर धोके निर्माण होतात. सध्या या मार्गावर सुरक्षा सुधारणा व संरक्षण भिंतींचे काम सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही तात्पुरती घाटबंदी करण्यात आली आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा
घाटातील वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सुरक्षिततेचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.






