
माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे चक्काजाम आंदोलन
पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत ठेकेदार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. “मायणी–पंढरपूर रस्ता पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. आम्ही मंत्री असताना या कामाचा पाया घातला होता, मात्र सत्तांतरानंतर ठेकेदारांनी मनमानी सुरू केली. सिमेंट काँक्रीट रस्त्यावर २१ दिवस पाणी मारणे आवश्यक असते, पण येथे दुसऱ्याच दिवशी वाहने सोडली जात आहेत. हा लोकांच्या जीवाशी खेळ आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
ते पुढे म्हणाले की, उंब्रजपासून कृष्णा नदी ओलांडल्यानंतर तीन महिन्यांपासून काम बंद आहे. अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण ठेवण्यात आला असून त्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे. “पोलीस प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे,” असा आरोप त्यांनी केला. पाटील यांनी ठेकेदारांवर गंभीर आरोप करत सांगितले की, “हॉटेलसमोर गटार खाली करून त्यांच्या व्यवसायाला चालना दिली जाते, तर शेतकऱ्यांच्या शेतासमोर गटार वर करून त्यांना रस्त्यावर येण्यापासून रोखले जाते. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.”
New Khambatki Tunnel: खंबाटकी बोगदा चाचणीसाठी खुला; पुणे–सातारा प्रवास होणार अधिक जलद आणि सुरक्षित
गेल्या दीड वर्षात आठ वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळेच हे आंदोलन उभारावे लागले, असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येत १५ मेपासून काम सुरू करून १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर आश्वासनाप्रमाणे काम झाले नाही, तर यापेक्षाही मोठे आणि उग्र आंदोलन उभारले जाईल.
शेतकरी, कामगार आणि वाहनधारकांचा संयम आता संपत चालला आहे.” दरम्यान, ‘दै. नवभारत’ने मायणी–मल्हारपेठ रस्त्यावरील निकृष्ट कामांबाबत प्रसिद्ध केलेल्या बातम्यांनाही बाळासाहेब पाटील यांनी पाठिंबा दर्शवत कामातील त्रुटींवर ठाम भूमिका मांडली. हे आंदोलन म्हणजे केवळ रस्त्याच्या प्रश्नावरचे आंदोलन नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उफाळून आलेला जनक्षोभ असल्याचे चित्र तासवडे येथे पाहायला मिळाले.