
Bandh called in Panchgani due to stalled development works full support from traders and people
Satara News : वाई : पाचगणी -महाबळेश्वर मार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात पाचगणी बंदला रविवारी व्यापारी, नागरिक तसेच विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच दुकाने, आस्थापने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण पाचगणी शहरात बंदचे वातावरण पाहायला मिळाले. (Panchgani News)
सुरूर ते पोलादपूर या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. पाचगणी ते भोसेपर्यंत काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला असून कामामध्ये सातत्य नसल्यामुळे नागरिक, व्यापारी तसेच पर्यटकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच खराब होण्याची शक्यता आहे . वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर पाचगणी क्लब येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक व व्यापारी संघटनांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत रस्त्याच्या कामातील दिरंगाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचगणी बंदची हाक देण्यात आली. या निर्णयाला शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, स्थानिक नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला.
हे देखील वाचा : बारामती अपघात प्रकरणातील मृत पिंकी माळीच्या कुटुंबियांना धमकी? राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
रविवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.पाचगणी परिसरातील तसेच मुख्य रस्त्यावरील तायघात, भोसे येथेही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवत आंदोलनाला समर्थन दिले. तसेच नागरिकांनीही या बंदला सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.
नागरिकांनी सांगितले की, सुरूर–पोलादपूर मार्ग हा पाचगणी, महाबळेश्वर तसेच कोकण भागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ काम रखडल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवस काम सुरू तर काही दिवस पूर्णपणे बंद अशी परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे.
हे देखील वाचा : बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे, तर उपसभापतीपदी…
दरम्यान, या बंदच्या माध्यमातून प्रशासन आणि संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी बंद मध्ये सहभागी नागरिकांनी केली आहे. अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. एकूणच पाचगणी बंदला व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याने प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन रखडलेले रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.