बीड-नगर रेल्वेला अखेर मुहूर्त मिळाला; 17 सप्टेंबरला धावणार रेल्वे, नागरिकांना मोठा फायदा होणार (फोटो सौजन्य - iStock)
संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दरवर्षी साजरा केला जातो. मात्र, यंदाचा हा दिवस बीड जिल्ह्यासाठी खास राहणार आहे. त्यांचे एक मोठे स्वप्न त्या दिवशी पूर्ण होणार आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीड-अहिल्यानगर डेमू रेल्वे सेवेचा लवकरच शुभारंभ या दिवशी होत आहे. या रेल्वे सेवेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
बीड-नगर या रेल्वेसाठी तिकीट दर फक्त 40 रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला परवडेल असा हा प्रवास असणार आहे. अधिकृत तिकीट दरांची घोषणा लवकरच केली जाईल. ही डेमू रेल्वे १६८ किलोमीटरचा प्रवास अंदाजे ५ तास आणि ३० मिनिटांत पूर्ण करणार आहे. कमी खर्चात आणि सुरक्षित प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे बीडकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड-अहिल्यानगर-परळी रेल्वे प्रकल्प मागील वर्षांत वेगाने पूर्ण करण्यात आला.
आता केंद्रातील नरेद्र मोदी सरकार स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे याद्वारे स्वप्न पूर्ण करत आहे. बीड शहरातील पालवण चौकात उभारलेले भव्य रेल्वे स्थानक आता प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. बीड ते अहिल्यानगर या मार्गावर एकूण १६ स्टेशनवर ही रेल्वे थांबणार आहे.
या स्टेशनवर थांबणार रेल्वे
बीड, राजुरी, रायमोह, विगणवाडी, घाटनांदुर, अंमळनेर, बावी, किन्ही, आष्टी, कडा, धानोरा, सोलापूरवाडी लोणी, नारायणडोह व अहिल्यानगर.
लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनापासून या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात होईल. या रेल्वे सेवेमुळे बीड आणि अहिल्यानगर या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होणार आहे. आतापर्यंत बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना या रेल्वेमुळे मोठा दिलासा मिळेल.
बीड-नगर तिकीट ४० रूपये
व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि इतर सर्व वर्गांना या सेवेचा थेट लाभ होईल. ही केवळ एक वाहतूक सुविधा नसून, दशकानुदशके जपलेल्या बीडकरांच्या स्वप्नाची पूर्तता आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. बीड – नगर तिकीट ४० रूपये राहणार आहे.