
जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे ३० किमी रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, राज्य महामार्ग रस्त्यांची चाळण झाली आहे. दीड ते दोन फुटांचे पडलेले खड्डे पाहता राज्य महामार्ग आहेत की पांदण रस्ता, असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यांच्या तत्काळ दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अत्यंत प्राधान्याने कार्यरत आहे. प्राप्त माहितीनुसार नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
९६ कोटींच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल
८८ अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून पाहणी करून ९६ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच युद्धापातळीवर रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येतील. सध्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती डागडुजी केली जात आहे. – अभिजित कुचेवार, कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, भंडारा. कारधा-खमारी रस्त्याला पुराचा फटका; या अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यातील काही मार्गावर पुलावरून पाणी गेल्याने रस्ते क्षतिग्रस्त झाले होते.
यामध्ये कारधाखमारी रस्ता (किमी ६/४००) येथील खमारी गावाजवळील नाल्यावरून पाणी वाहून गेल्याने काही काळ संपर्क तुटला होता. मात्र, प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन सदर रस्ता व पुलाची स्थिती पूर्ववत करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्ह्यातील जनतेला सुखकर, सुरक्षित आणि विनाअडथळा वाहतूक व्यवस्था देण्यासाठी सतत कटिबद्ध असून, आपत्कालीन परिस्थितीतही यंत्रणा सतर्क असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Bhandara News: दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहकाचा मृत्यू; कोरंभी परिसरातील बायपास मार्गावरील घटना
सर्वेक्षण आणि देखभाल-दुरुस्तीचे कार्य सुरू
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी जिल्ह्यातील रस्त्यांचे सर्वेक्षण व पाहणी करण्यात येते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विशेष प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवले जातात व ते तातडीने मंजूर करून घेतले जातात. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि इतर दुरुस्तीची कामे एएमसीअंतर्गत मंजूर असल्याने, युद्धपातळीवर खड्डे बुजवून रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी सुरळीत करून देण्यात आले आहेत. तसेच, एएमसीची कामे कशा पद्धतीने करावीत याबाबत वरिष्ठांकडून वेळोवेळी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन प्रशिक्षणही देण्यात येते. चालू वर्षात भंडारा जिल्ह्यासाठी रस्ते देखभाल व दुरुस्तीअंतर्गत तब्बल १७०० लाख (१७कोटी) रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील खराब व क्षतिग्रस्त रस्त्यांची डागडुजी केली जात आहे.
अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहनांचे नुकसान
चाळण झालेल्या रस्त्यांमुळे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी खड्डयांचा अंदाज घसरून पडत असून गंभीर जखमी होत आहेत. तसेच खोल खड्डयांमुळे चारचाकी व जड वाहनांचे सॉक अॅब्जॉर्बर, टायर व इतर सुटे भाग खराब होऊन वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.