
उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, सर्व निर्णय...; भाजपच्या नेत्याची टीका
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कट कारस्थान करत उबाठा गटाचे आपणच प्रति पक्षप्रमुख असल्याचे सिद्ध करत राऊतांनी एका दगडात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि प्रियांका चतुर्वेदी या तीन पक्षांना घायाळ केले आहे, असा घणाघातही बन यांनी केला.
यावेळी बन म्हणाले की, महिनाभरापूर्वीच राऊतांनी मविआकडून शरद पवार यांचे नाव जाहीर केले होते आणि राऊतांचा तोच निर्णय काँग्रेस आणि उबाठा गटावर लादला गेला. शरद पवारांप्रति असलेल्या प्रेमापोटी नव्हे तर प्रियांका चतुर्वेदी यांचे उबाठा गटामधील वाढणारे अस्तित्व कमी करून त्यांचे पंख छाटण्यासाठी राऊतांनी शरद पवारांचे नाव पुढे केले होते. सर्वात कमी संख्याबळ असतानाही शरद पवारांना उमेदवारी घोषित झाली यावरूनच मविआमध्ये काँग्रेसची अवस्था तर वापरून फेकून द्यावे तशी कढीपत्त्यासारखी झाली आहे. उद्धव ठाकरे तर विधानपरिषदेकडे डोळे लावून बसल्याने त्यांच्यासमोर या निर्णयाला मम म्हणण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचाही टोला त्यांनी लगावला.
दोन राष्ट्रवादींचे विलिनीकरण करायचे की नाही हा निर्णय घेण्यास आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्राताई पवार सक्षम आहेत. सुनेत्राताईंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय उत्तमरित्या प्रगती करेल असा विश्वास व्यक्त करत बन म्हणाले की, सुनेत्राताईंना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची गरज उरलेली नाही. मविआकडून शरद पवारांचे नाव घोषित करण्याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी न करण्याची अटच घातली होती. मात्र शरद पवारांचा स्वभाव आणि कमकुवत झालेल्या राष्ट्रवादीला ही अट कितपत पेलेल ही शंकाच आहे असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.