
फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा : खरीप हंगामाची चाहूल लागली असून मृग नक्षत्र अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. रब्बी हंगामानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. वेळेवर पाऊस पडून मृगात पेरणी झाल्यास चांगले उत्पादन मिळते, असा अनुभव असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.
शेती हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने पावसाचे आगमन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. योग्य वेळी पाऊस झाल्यास पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. मात्र, बदलत्या हवामानामुळे गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
पूर्वी शेतीची बहुतांश कामे बैलजोडी आणि मजुरांच्या मदतीने केली जात होती. आता मात्र शेतीत मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले आहे. ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यांसारख्या यंत्रांच्या सहाय्याने मशागतीपासून काढणीपर्यंतची कामे वेगाने होत आहेत. मात्र डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेतीचा खर्चही लक्षणीय वाढला आहे.
ग्रामीण भागात मजुरांची कमतरता हीदेखील मोठी समस्या ठरत आहे. बांधकाम आणि इतर क्षेत्रांमध्ये अधिक मजुरी मिळत असल्याने अनेक मजूर शेतीपासून दूर गेले आहेत. त्यामुळे कापूस वेचणी, सोयाबीन सोंगणी, उडीद-मुग तोडणी यांसारख्या कामांसाठी शेतकऱ्यांना बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहेत.
गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी तसेच विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे शेती व्यवसाय अधिकच संकटात सापडला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीचा वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच उत्पादित मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अडचणी वाढत आहेत.
अशा परिस्थितीत खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास पेरण्या वेळेत पूर्ण होऊन यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.