
फोटो सौजन्य - Social Media
Buldhana News : एकीकडे संपूर्ण देशात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला जात असताना आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश दिला जात असताना, दुसरीकडे खामगाव शहरात घडलेल्या एका घटनेने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दिवशीच खामगाव नगर परिषदेकडून वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप होत असून या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
माहितीनुसार, खामगाव रेल्वे स्टेशनसमोरील परिसरात नगर परिषदेकडून अस्थायी दुकाने उभारण्यात आली आहेत. तसेच घाटपुरी नाका परिसरातील नाल्याच्या बांधकामाचे कारण देत शुक्रवारी दुपारी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली. पर्यावरण दिनाच्याच दिवशी दोन मोठी झाडे पूर्णपणे तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे आणखी दोन झाडांची तोड तात्पुरती थांबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे शहरातील पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी प्रशासनाच्या या कृतीवर टीका करत विकासकामांच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जात असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला शासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला अनेक वर्षे परिसराला सावली देणाऱ्या वृक्षांची तोड होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
तरुणाई फाउंडेशनचे सचिव राजेंद्र कोल्हे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातो. मात्र त्याचवेळी झाडांची तोड केली जात असेल तर ती चिंतेची बाब आहे. विकासकामे आवश्यक असली तरी पर्यावरणीय नियमांचे पालन करणे आणि पर्यायी वृक्षारोपण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा पर्यावरण दिन केवळ औपचारिकता ठरेल, असे त्यांनी म्हटले.
पक्षीमित्र संजय गुरव यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. केवळ पर्यावरण दिन साजरा करून किंवा पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देऊन उपयोग होणार नाही. प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. नवीन झाडे लावण्यापेक्षा सध्या अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन कसे करता येईल यावर प्रशासनाने अधिक भर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पर्यावरणप्रेमींचा सत्कार करण्यापेक्षा अनावश्यक वृक्षतोड रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नवसंकल्प फाउंडेशनच्या सचिव वैष्णवी गोलाईत यांनी सांगितले की, युवक मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण मोहिमांमध्ये सहभागी होतात. मात्र त्याच दिवशी झाडांची तोड होत असल्याचे पाहून निराशा वाटते. पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण धोरण आणि जनसहभागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणप्रेमी बेटी गव्हांदे यांनीही या घटनेबाबत खंत व्यक्त केली. पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो, पण त्याचवेळी शहरात वृक्षतोड होत असेल तर त्या संदेशाचे महत्त्व कमी होते. नवीन झाडे लावणे महत्त्वाचे असले तरी आधीपासून अस्तित्वात असलेली झाडे वाचवणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे खामगाव नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीची चौकशी करण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी ठोस धोरण आखण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही पर्यावरणप्रेमींनी दिला असून येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.