
दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! विक्रोळी परिसरातील ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
या तांत्रिक अडथळ्यामुळे मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या लोकल गाड्या ठप्प करण्यात आले आहे.परिणामी अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावू लागल्या आणि सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेत ओव्हरहेड वायरवरील प्लास्टिक काढण्याचे काम तातडीने सुरू केले. सुरक्षितता लक्षात घेऊन काही काळ वाहतूक नियंत्रित करण्यात आली. अडथळा दूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मुंबईकडे येणारी वाहतूक प्रभावित झाली असली तरी ठाणे-कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Local services halted between Kanjurmarg and Bhandup on slow line towards CSMT because of a Plastic stuck on OHE. The plastic is being removed by turning off OHE and services will be restored shortly. pic.twitter.com/LpmMmEHO1X — Central Railway (@Central_Railway) July 6, 2026
मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या विविध मार्गांवर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याआधी कर्जत-खोपोली मार्गावर रुळांखालची खडी वाहून गेल्यामुळे लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यातच विक्रोळी परिसरातील ही घटना घडल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सलग दुसऱ्या मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा सोशल मीडिया हँडलवरून लोकल सेवेची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.