
Chandrapur News: कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तलावातील लाखो लिटर पाणी वाया; शेतकऱ्यांचा संताप, कारवाईची मागणी
चौगाण येथील तलावाचे काम सुरू करण्यात आले. उन्हाळ्यात मोरीचे काम न करता, २० जुलैपासून कंत्राटदाराने भर पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात आणि वाहत्या पात्रात मोरीचे काम हाताळले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असताना लोखंडी सळ्या उभ्या करून कॉंक्रिटीकरण केले जात असल्याचे छायाचित्रांवरून स्पष्ट दिसत असून, हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम आहे, असा आरोप स्थानिक नागरीकांनी केला. मात्र याकडे दुर्लक्ष करीत काम सुरूच ठेवण्यात आले. त्यानंतर मुसळधार पावसास सुरूवात झाली. मात्र काम करण्यासाठी तलावाचे पाणी अडवून ठेवणारे आवरण कंत्राटदारांने बांधकामासाठी हटविले होते, ते पूर्ववत करण्यात आले नाही.
तलावातील पाणी बाहेर पडून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून गावातील भगवान प्रधान यांनी १ महिन्यापूर्वी कंत्राटदाराला ३ ते ४ वेळा फोन करून पाणी अडवणारे आवरण पूर्ववत बंद करण्याची विनंती केली होती. मात्र कंत्राटदाराने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. यानंतर जलसंधारण (ल.पा.) उपविभागीय अधिकाऱ्यांनाही २ ते ३ वेळा फोनवरून जाणीव करून दिली असता, त्यांनी फक्त करून देतो असे पोकळ आश्वासन दिले.
अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळेच आज ५० हेक्टर शेतीवर संकट ओढवले आहे. याविषयी शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केले जात आहे. तलावाच्या दोन्ही मोरीतील पाण्याचा प्रवाह तत्काळ बंद करून ५० हेक्टर धान शेती वाचवावी आणि वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
सदर कामाच्या दर्जाबाबत शंका आल्याने सामाजिक कार्यकर्ते कृपाकर चहांदे यांनी ८ जून रोजी माहिती अधिकारांतर्गत अंदाजपत्रक मागितले होते. परंतु अधिकाऱ्यांनी ते दडपले. २२ जूनच्या च्या प्रथम अपीलावर कार्यकारी अभियंत्यांनी सुनावणीचे आदेश देऊनही ब्रम्हपुरी कार्यालयाने सुनावणी घेतली नाही. अखेर ३१ जुलै रोजी राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठात द्वितीय अपील दाखल करण्यात आली.