
Chandrapur News: राजुरा-आसिफाबाद मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात, वाहतुकीची समस्या गंभीर; नागरिकांकडून कारवाईची मागणी
काही भंगार व्यावसायिक, चायनीज सेंटर चालक आणि इतर व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटनाही घडत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील विविध चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर, पोस्टर आणि जाहिराती लावण्यात आल्याने शहराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी फलक आणि जाहिरातींचे जाळे निर्माण झाल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली. आधीच शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर असताना रस्त्यावर फलक, खुच्र्चा आणि इतर साहित्य ठेवण्याचे प्रकार वाढल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण हटवून बसविण्यात आलेल्या गड्डू टाइल्सवरही पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून रस्त्यांवरील अतिक्रमणे, अनधिकृत फलक तसेच बॅनर-पोस्टर हटवावेत, अशी मागणी केली. वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून प्रमुख मार्ग अतिक्रमणमुक्त करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राजुरा शहरातील प्रमुख मार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे सार्वजनिक रस्त्यांचा वापर खासगी व्यवसायासाठी होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर ठेवण्यात आलेले फलक, खुर्चा, साहित्य तसेच अनधिकृत बॅनरमुळे वाहतूक कोंडी वाढत असून अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.