
Chandrapur News: काँग्रेसच्या हातून जाणार मनपा? शहरात रंगला चर्चा, सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरु
चंद्रपूर महानगर पालिकेच्या ६६ नगरसेवकांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाला. त्या निकालानुसार काँग्रेस आघाडीला ३०, भाजप युतीला २४, उबाठा ६, वंचित २, अपक्ष २, एमआयएम व बसपा प्रत्येकी १ जागेवर विजयी झाले. त्यानंतर चंद्रपुरातील सत्तास्थापनेचे चित्र दररोज बदलत गेले. सुरुवातीला काँग्रेससोबत आघाडी असलेल्या जनविकास सेनेने एमआयएमसोबत ४ नगरसेवकांची गटनोंदणी केली. तर वंचित व अपक्षांच्या नगरसेवकासह उबाठाने गटनोंदणी केली. याच कालावधीत काँग्रेसमध्ये आ. वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यात गटनोंदणीवरून वाद उद्भवला.
वाद वरिष्ठांच्या आदेशानुसार सुटल्याचे सांगितले जात असले तरी वडेट्टीवार यांच्या गटाला महापौरपद न मिळाल्याने धानोरकर यांच्या गटातील महापौरपदासाठी वडेट्टीवार गटाचे नगरसेवक मतदान करणार का? की मतदानाच्या दिवशी गैरहजर राहणार? अशी शंका राजकीय जाणकारांतून उपस्थित केली जात आहे. सध्या काँग्रेसकडे २७, जनविकास सेनेचे ४, बसपचा १ असे ३२ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. यानुसार धानोरकर गटाला महापौरपद, वडेट्टीवार गटाला गटनेता आणि उपमहापौरपद, तर उबाठा सोबत आल्यास त्यांना स्थायी समितीचे सभापतिपद देण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र उबाठा महापौरपदावर ठाम असल्याने भाजपकडून अडीच वर्ष महापौरपद दिल्यास त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे उबाठा भाजपसोबत गेल्यास काँग्रेस मनपाच्या महापौरपदापासून दूर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसने तिकीट नाकारल्याने बंडखोरी करत प्रशांत दानव व नंदू नागरकर यांनी अपक्ष उभे राहून विजय संपादन केले. आज काँग्रेसकडे ३२ नगरसेवक आहेत, बहुमतासाठी पुन्हा २ नगरसेवकांची आवश्यकता आहे. नागरकर व दानव यांचा काँग्रेसला पाठींवा मिळाल्यास काँग्रेस सहज सत्ता स्थापन करू शकते, अशी स्थिती आहे. मात्र निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी नागकर व दानव यांना पक्षाची उमेदवारी मिळू दिली नाही. सोबतच निकाल येण्याआधीच पक्षातून बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याने हे दोघेही काँग्रेसऐवजी शिवसेना उबाठासोबत गेले आहेत. त्यामुळे त्यांचे घाईमध्ये केलेले निलंबन कीती महागात पडणार हे येणारी वेळच सिध्द करेल.
जनविकास सेनेकडे एमआयएमच्या १ नगरसेवकासह ४ नगरसेवक आहेत. सध्या त्यांचा पाठिंबा गृहीत धरण्यात येत असला तरी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला कंटाळलेल्या पप्पू देशमुख यांनी विकासाच्या मुद्दयावर कोणालाही मतदान न करता स्थिर राहण्याची भूमिका घेतली तर काँग्रेसच्या हातून सत्ता जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.