
प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्...
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रशासक कार्यकाळात आपत्कालीन अधिकारांचा वापर करून कोट्यवधी रुपयांची कामे विनानिविदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. तब्बल २१ कामांबाबत आक्षेप नोंदवत त्यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत जाऊन आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली. दीड तास चाललेल्या बैठकीत प्रशासक काळातील विविध निर्णय, खर्च आणि कार्यादेशांची माहिती मागविण्यात आली. विशेषतः कलम ६७ (३) (क) अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
महापालिकेवर सलग सहा वर्षे प्रशासक राजवट होती. या काळात विविध विकासकामांसाठी आपत्कालीन तरतुदीचा वापर करण्यात आला. मात्र, हे अधिकार केवळ तातडीच्या परिस्थितीसाठी असताना त्यांचा वापर अनावश्यक कामांसाठी केल्याचा दावा बंब यांनी केला. शासकीय निवासस्थानाचे नूतनीकरण, पेव्हर ब्लॉक टाकणे यासारख्या कामांवर २० कोटींचा खर्च केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही प्रशासक कार्यकाळातील कामांबाबत माहिती मागण्यासाठी बंब यांनी महापालिकेत भेट दिली होती. कागदपत्रांबाबत प्रशासनाकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने त्यांनी हा विषय विधिमंडळात उपस्थित केला होता.
आता पुन्हा महापालिकेत येऊन संबंधित कामांची कागदपत्रे, खर्चाचा तपशील आणि प्रशासकीय मंजुरीबाबत माहिती मागितली. बैठकीत मुख्य लेखाधिकारी संतोष वाहूळे यांनी काही मुद्द्यांवर खुलासा केला. मात्र, तो समाधानकारक नसल्याचे सांगत बंब यांनी प्रत्येक प्रकरणाची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली.
२१ प्रकरणांची यादी आयुक्तांसमोर ठेवली
मंगळवारी झालेल्या बैठकीत आमदार बंब यांनी तब्बल २१ मुद्द्यांची यादी आयुक्तांसमोर ठेवली. आर्थिक अनियमितता, विनानिविदा खर्च आणि प्रशासकीय प्रक्रियेतील त्रुटींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
आपत्कालीन अधिकारांचा वापर की गैरवापर?
महापालिका कायद्यातील कलम ६७ (३) (क) अंतर्गत आयुक्तांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची कामे निविदेविना करण्याचे अधिकार आहेत. मात्र, याच तरतुदीचा आधार घेऊन सुमारे २० कोटी रुपयांची कामे करण्यात आल्याचा आरोप बंब यांनी केला. या कामांपैकी अनेक कामे अत्यावश्यक स्वरूपाची नसल्याने निविदा प्रक्रिया टाळण्यात आली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हे सुद्धा वाचा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
वर्षभरापासून सुरू आहे बंब यांचा पाठपुरावा
प्रशासक कार्यकाळातील निर्णयांबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत बंब यांनी वर्षभरापूर्वी तत्कालीन प्रशासक जी. श्रीकांत यांच्याकडे माहितीची मागणी केली होती. अपेक्षित माहिती न मिळाल्याने त्यांनी हा विषय विधिमंडळात उपस्थित केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी त्याच मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारला आहे.