
शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तसेच प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २०२२ मध्ये ऑलेक्ट्रा कंपनीशी करार केला होता. या प्रकल्पात नऊ मीटर आणि बारा मीटर लांबीच्या एकूण ३५ ई-बसांचा समावेश करण्यात आला होता. मात्र कराराला चार वर्षांचा कालावधी उलटूनही प्रकल्प अपेक्षित गतीने पुढे सरकलेला नाही. महापालिकेने अनेक वेळा कंपनीला मुदतवाढ दिली.
प्रत्येक सहा महिन्यांनी वाढविण्यात आलेल्या मुदतीमुळे प्रकल्पाची अंमलबजावणी सातत्याने लांबणीवर पडत गेली. सध्या कंपनीला देण्यात आलेली मुदत १५ जून रोजी संपत आहे. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्यास जूनअखेरीस अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जाधववाडी येथील बस डेपोमध्ये ई-बसांसाठी चार्जिंग यंत्रणा उभारण्याचे काम अंतिम टप्यात पोहोचले आहे. त्यामुळे बसेस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लाभ मिळू शकलेला नाही.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरासाठी ३५ ई-बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी २०२२ मध्ये ऑलेक्ट्रा कंपनीशी करार करण्यात आला. मात्र आतापर्यंत केवळ एकच बस उपलब्ध झाली आहे. उर्वरित ३४ बसेस कधी मिळणार याबाबत कंपनीकडून स्पष्टता नसल्याने महापालिकेने नाराजी व्यक्त केली आहे.
जाधववाडी डेपोमध्ये चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे आले असतानाही बस नसल्याने संपूर्ण व्यवस्था वापराविना पडून आहे. त्यामुळे जूनअखेरीपर्यंत कंपनीने बसेस उपलब्ध करून देण्याबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर करार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.