
शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सुमारे २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीकडून या प्रकल्पाची अमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत मुख्य जलवाहिनी, जॅकवेल, एमबीआर, जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ तसेच २०००, १५०० आणि ११०० मिमी व्यासाच्या जोडवाहिन्यांचे काम पूर्णत्वास आले आहे.
जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३८ किमी अंतरावर २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या लाईनचे काम अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीच्या आठ ते नऊ किलोमीटरपर्यंत हायड्रोलिक चाचणी घेण्यात आली होती. मात्र, उर्वरित भागाची पूर्ण क्षमतेने चाचणी करण्यात आलेली नाही. कामाच्या दरम्यान जलवाहिनीची अल्ट्रासाऊंड रेडिओलॉजी तपासणी करण्यात आल्याचे सांगितले जाते.
महत्त्वाच्या प्रकल्पात संपूर्ण हायड्रोलिक चाचणी न घेण्याचा निर्णय घेतल्याने काही तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः २५०० मिमी व्यासाच्या मुख्य लाईनसारख्या मोठ्या पायाभूत सुविधांमध्ये दाब चाचणी ही गुणवत्ता नियंत्रणाची मूलभूत प्रक्रिया मानली जाते. प्रशासनाने मात्र कंत्राटदाराच्या हमीपत्रामुळे आर्थिक जोखीम कमी होईल, असा दावा केला आहे. प्रत्यक्षात जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतरच या निर्णयाची परिणामकारकता स्पष्ट होणार आहे. दरम्यान, योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शहराला दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या बहुतांश कामे पूर्णत्वास आली असून अंतिम चाचण्या आणि जोडणी प्रक्रिया सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्य जलवाहिनीची पूर्ण हायड्रोलिक चाचणी घेणे आवश्यक नसल्याचे मत कंपनीकडून मांडण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनीमध्ये भविष्यात कोणतीही गळती किंवा फुटीची घटना घडल्यास त्याची दुरुस्ती कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चाने करावी, अशी अट घातली. कंपनीने याबाबत लेखी हमी दिल्यानंतरच चाचणी टाळण्याचा निर्णय अंतिम झाल्याचे सांगण्यात येते.