बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना CCTV ने पकडलं; १९ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड (Photo Credit- X)
मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून सामूहिक काॅपी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, परीक्षा केंद्रावर उपलब्ध CCTV फुटेजच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीत विद्यार्थ्यांकडून एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण १९ जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक व बैठे पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. तसेच, इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात त्यांच्या संस्थेमार्फत संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक कार्यवाही करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या गैरप्रकाराचे गांभिर्य लक्षात घेता, प्रशासनाने या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला असून, पुढील सर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आदेश दिले.
ही संपूर्ण कारवाई शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली व सीताराम पवार विस्तार अधिकारी यांनी केली असून, जिल्हाभरात “उपरवाला सब देख रहा है” या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना ठरली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात असल्याने, परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
या प्रकरणातून सर्व परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, बैठे पथक व संबंधित घटकांसाठी एक महत्त्वाचा धडा मिळण्यासारखा असून, भविष्यात परीक्षा अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियमांनुसार घेणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इयत्ता १२ वीच्या परीक्षेत गैरप्रकार; “उपरवाला सब देख रहा है “चा प्रत्यय देणारी सीसीटीव्ही आणि उत्तरांच्या झेरॉक्स प्रति आधारित ही कारवाई करण्यात आली. दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने केली.






