
छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू
नियोजित वेळापत्रकानुसार ९ मे रोजी पंपिंग सुरू होणे अपेक्षित होते; मात्र काही तांत्रिक दुरुस्तींमुळे हा टप्पा पुढे ढकलण्यात आला. अखेर सोमवारी सकाळी ९ वाजता पहिला पंप सुरू करण्यात आला. या पंपातून ताशी सुमारे ४५ लाख लिटर क्षमतेने पाणी उपसा सुरू झाला. दुपारनंतर दुसरा पंपही कार्यान्वित करण्यात आला असून त्यातूनही तितक्याच क्षमतेने पाणी वहन सुरू आहे. जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने पाणी उपशात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर सायफन प्रणालीत बदल करण्यात आला आहे. सायफनचे पाईप सुमारे दोन मीटरने खाली सोडण्यात आले असून त्यामुळे पाण्याचा उपसा अधिक कार्यक्षमतेने होण्यास मदत होणार आहे.
जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान सुमारे ३८ किमी लांबीची आणि २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीची संपूर्ण स्वच्छता करण्यात येत असून टप्प्याटप्याने स्कोअर व्हॉल्व्ह आणि बटरफ्लाय व्हॉल्व्हद्वारे पाणी सोडून त्यांची कार्यक्षमता तपासली जात आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील अडथळे टाळण्यास मदत होणार आहे.
नवीन योजनेद्वारे १२ जूनपासून २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येत असून, वेळेत पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. शहरवासीयांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
जलवाहिनीची स्वच्छता आणि सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात मंगळवारी दि.१२ मे रोजी पाणी घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर शुद्धीकरण यंत्रणेची चाचणी आणि स्थिरीकरणासाठी सुमारे सात दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.
जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आल्यानंतर ब्लिचिंग पावडर आणि अलम यांचे प्रमाण निश्चित करणे, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, तसेच अंतर्गत यंत्रणांची चाचणी ही कामे सात दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत. सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्पा सुरू केला जाईल.
एमबीआर (मास्टर बॅलन्सिंग रिझव्हॉयर) मध्ये पाणी सोडण्यापूर्वी सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण करून आवश्यक प्रमाणपत्र (पिसो) मिळवणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेनंतरच २२ मेपासून एमबीआरमध्ये पाणी घेण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे.