
बिल भरले नाही तर ऑटोमॅटिक वीज पुरवठा बंद केला जात असल्याने आता स्मार्ट मीटर काय चीज आहे हे लोकांना कळायला लागले आहे. परंतु आंदोलनात न येण्याची उदासीनता दाखवून नागरिक स्मार्ट मीटर लावणाऱ्या सरकारची हिम्मतच वाढवत आहेत असे मत आंदोलकांनी व्यक्त केले. आंदोलनात येण्याची इच्छा नसेल तर किमान निवडून दिलेले सत्ताधारी लोकप्रतिनिधींना भेटून स्मार्ट मीटरचा हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडा असेही यावेळी जाहीर आवाहन आंदोलकांनी केले.
स्मार्ट मीटर लावण्याशी सरकारचा संबंध नाही असा संभ्रम निर्माण केला जात आहे. तर सरकारच्या आदेशाने दिलेल्या कंत्राटाद्वारे अदानी, मोंटे कार्लो, एनसीसी या भारतीय कंपन्या सरकारच्या परवानगीने लावत आहेत. त्यामुळे जनतेने स्वतःची फसवणूक करून न घेता स्मार्ट मीटर हे महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या आदेशानेच लावले जात आहेत ह ध्यानात घ्यावे असे आवाहन करत भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पुन्हा एकदा महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. भाकपच्या या आंदोलनात अॅड. अभय टाकसाळ, एजाज शेख, शेख अमजद शेख पाशु, शेख नुर, संतोष काळे, सय्यद मकसूद अली, गौतम शिरसाठ, अभिजीत बनसोडे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
एनसीसी कंपनीचे कंत्राट रद्द करावे, जबरदस्ती व गुपचूप लावलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढून घ्यावे व त्या ठिकाणी जुने मीटर लावावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी महावितरणला देण्यात आले.