
पाणीपुरवठ्यात 'गॅप' कायमच! उन्हाळ्यात ६ ते १० दिवसांनी पाणी येण्याची भीती (Photo Credit- AI)
सध्या शहरातील बहुतांश भागांमध्ये सहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो, तर काही भागांत आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी वितरणाचे योग्य नियोजन करून गॅप कमी करण्याचे आदेश महापौरांनी बैठकीत दिले होते. यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत सविस्तर आराखडा सादर करण्यास सांगण्यात आले होते.
निर्धारित मुदतीनंतर काही दिवसांनी अधिकाऱ्यांनी आराखडा सादर केला. त्यामध्ये काही सुधारणा सुचवत महापौरांनी गॅप कमी करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले. उन्हाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यावर त्यांनी भर दिला होता. तथापि, आराखडा सादर होऊनही प्रत्यक्षात पाणीपुरवठ्यात कोणताही लक्षणीय बदल दिसून आलेला नाही. शहरातील बहुतांश भागांमध्ये पूर्वीप्रमाणेच गॅप कायम आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महापौरांच्या आदेशानंतरही परिस्थिती बदलत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. संबंधित विभागाने केवळ आराखडा सादर करून कर्तव्यपूर्ती केल्याचे दाखवले का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
पाणीपुरवठ्यातील गॅप कमी न झाल्यास येत्या उन्हाळ्यात शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढत असताना पुरवठा मात्र पूर्ववत राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गॅप कमी करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.