गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली 'AI प्रयोगशाळा'
या एआय प्रयोगशाळेत परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानात शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने समान संधी मिळणार आहे. महाराष्ट्र हे राज्य देशातील एआय हब म्हणून विकसित करण्याच्या शासनाच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. गणोरी शाळेसोबत उमरेड जिल्हा नागपूर आणि मावळ जिल्हा पुणे येथील दोन शाळांची देखील राज्यातून निवड झाली आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रक जारी केले आहे.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल आणि एचपी इंडिया यांच्या दरम्यान २० ऑक्टोबर २०२५ रोजी सामंजस्य करार झाला होता. या करारानंतर गणोरी शाळेच्या निवडीबाबत आयुक्त शिक्षण सचिंद्र प्रताप सिंह यांनी महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन परिषदेला याबाबत अवगत केले होते.
एचपी इंडिया फाउंडेशन च्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण, एआय आधारित प्रकल्प, संगणकीय शिक्षण यांची जबाबदारी लर्निंग लिंक्स या देशातील प्रतिष्ठित संस्थेला देण्यात आली आहे. एचपी फाउंडेशनचे नवीन चावला आणि लर्निंग लिंक्सच्या वतीने ऋतुपर्ण मतकर, प्रदिप रोकडे यांनी शाळेला भेट देऊन समाधान व्यक्त केले. अत्यंत आधुनिक स्वरूपाच्या या प्रयोगशाळेच्या उभारणीचे काम सध्या सुरू असून शैक्षणिक वर्षअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
इच्छा असूनही नोकरी सोडू शकत नाही? तुम्ही पण ‘Job Hugging’ चे बळी ठरला आहात का? नेमकं आहे तरी काय?
नव्या शैक्षणिक वर्षात गणोरी शाळा आणि परिसरातील विद्यार्थी नव्या प्रयोगशाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे गिरवणार आहेत. गणोरी प्रशालेच्या या निवडीकरिता विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ, शिक्षण सहसंचालक रवींद्र वाणी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक तथा विस्तार अधिकारी दिलीप शिरसाठ, विस्तार अधिकारी राजेश महाजन आदींचे शाळेचे मुख्याध्यापक अनिल प्र. देशमुख, शाळा समितीचे अध्यक्ष कैलास गायकवाड, समितीचे सर्व सदस्य व शिक्षक वृंद आणि पालकांनी आभार व्यक्त केले आहे. नव्या कार्य संधीसाठी विद्यार्थ्यांना तयार करणाऱ्या भविष्यवेधी शिक्षणाचा एआयचे अध्ययन हा भाग आहे. नवीन रचनात्मक विचार करून विद्यार्थी काही चौकटीबाहेरील प्रकल्प पूर्ण करू शकतील. मशीन लर्निंग आणि डेटा विश्लेषण यांची संधी शालेय जीवनातच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळत आहे, ही महत्त्वाची बाब आहे.
येत्या पाच वर्षात राज्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना महा एआय मिशन या प्रकल्पाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलची पायाभूत समज वाढवली जाणार आहे. या प्रकल्पाच्या प्रारंभी मराठवाडा विभागातून गणोरी येथील एकमेव शाळेची निवड झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करून समस्या सोडविण्याच्या कौशल्याला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतून भविष्यातील उदयोन्मुख तंत्रज्ञानाधारित नौकऱ्यासाठी सक्षम नागरिक घडविण्याचे उद्दिष्ट आहे.
कर्नाटकात 93 टक्के विद्यार्थ्यांनी निवडली ‘हिंदी’; इंग्रजी, कन्नडनंतर तिसरी भाषेला पसंती






