जालना रोडवरील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या सभागृहात नियामक मंडळाची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत बोलताना ते म्हणाले, यापुढे पगार हवा असल्यास पाणीपट्टी वसुली वर भर द्यावा लागेल असा दम अधिकाऱ्यांना भरला. कार्यालय स्थलांतराच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्याने तूर्त हा विषय बाजुला ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील यांत्रिकी विभागास बंद करण्याची शिफारस सरकारकडे केली जाणार असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही विखे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. मंत्र्यांनी नव्या मुद्दा चर्चेत आणून कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांत पुन्हा एकदा घबराहट निर्माण केल्याची चर्चा रंगली. मुख्य अभियंता कार्यालय नांदेड हलवण्याच्या मुद्यावरुन कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ पसरला होता. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने तूर्त हा विषय बाजुला ठेवण्यात आला. असे असले तरी यांत्रिकी विभाग बंद करण्याच्या मुद्याने पुन्हा एक नवे वादळ उभे राहिले आहे.
यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी थेट विखे पाटील यांच्या कानावर हा विषय टाकला असता, यानंतर असे होणार नाही असे सांगत थेट कार्यकारी संचालक संतोष तीरमनवार यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे त्यांनी आदेश दिले. मंडळ हे शेतकऱ्यांसाठी असून शेतकरी हिताचेच कामे इथे चालतील, असेही विखे यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण कानावर आले नव्हते, याची दखल आम्ही घेतली आहे, संबंधित पोलिस अधिकारी अतिश लोहकरे यांची चौकशी करुन त्यांना समज दिली.
बैठकीदरम्यान एकीकडे माध्यमांसह अनेक जणांना पोलिसांनी आणि खासगी सुरक्षारक्षकांनी आतमध्ये जाताना अडवले, तर दुसरीकडे छातीवर ‘कमळ’ लावलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना अडवले जात नव्हते. हा प्रश्न उपस्थित करताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अतिष लोहकरे यांनी उपस्थितांना अरेरावीची भाषा करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप बुलंद छावाने केला आहे.






