
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अतिरिक्त आयुक्त कल्पना पिंपळे, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अपर आयुक्त (विकास व नियोजन) सुषमा देसाई, सहआयुक्त देविदास टेकाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उच्च न्यायालयाने शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सबंधित कंपनीला दिले आहेत. त्यानुसार नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पाणी प्रक्रिया केंद्र, एरिएशन, क्लोरिनेशन व फिल्ट्रेशन प्रकल्पांची पाहणी यावेळी करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे संबंधित कंत्राटदार, प्राधिकरण आणि मनपा यांनी समन्वयाने पूर्ण करावीत, असे सांगितले.
नऊशेच्या पाइपलाइनमधून मिळणारे पाणी ४५ एमएलडी इतका झाला आहे. तसेच बाराशेच्या योजनेतूनही ११५ ते १२० एमएलडी इतके मिळत आहे. त्यामुळे शहराला १६० एमएलडी इतका पाणी पुरवठा केला जात असून पाण्याचा दाब वाढल्यामुळे अनेक भागाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र जयविश्वभारती कॉलनी, मरिमाता, एन-८, रामनगर, मुकुंदवाडी, भिमनगर-भावसिंगपूरा, पडेगाव, जुन्या शहरातील काही भागाला नवव्या ते दहाव्या दिवशी पाणी मिळत असल्याची ओरड होत आहे.