संग्रहित फोटो
संभाजीनगर : राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली आहे. आज त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, ‘नवा भिडू, नवा राज’ याप्रमाणे स्थानिक कार्यकारिणीतही खांदेपालटाचे वारे वाहत असून, अनेक कार्यकर्त्यांनी यासाठी लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. बुलडाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आता कार्यकारिणी बदलाची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यभरासह छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातही बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. नव्याने शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलले जाणार अशी चर्चा काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये केली जात आहे. त्यामुळे नव्याने शहराध्यक्षपदाच्या निवडीसाठी अनेकांच्या मनात पालवी फुटायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये जरी काँग्रेसने मविआसोबत चांगली कामगिरी केली असली तरी विधानसभा निवडणूक काबीज करण्यात पक्षाला मोठे अपयश आले.
राज्यासह संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाचा सुपडासाफ झाला. यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नवे प्रदेशाध्यक्ष स्थानिक कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी त्यासाठी वरिष्ठांकडे लॉबिंगदेखील सुरु केली असल्याचे सांगितले जात आहे.
निर्णय मान्य
नव्याने आलेले प्रदेशाध्यक्ष पूर्वीचे सगळं बरखास्त करून नव्याने मोट बांधतात. सध्या तरी कार्यकारिणी जुनीच आहे. जेव्हा प्रदेशाध्यक्ष आदेश देतील तेव्हा त्यात फेरबदल होतील किवा तीच कार्यकारिणी पुढेही राहील. प्रदेशाध्यक्ष पदभार स्वीकारतील त्यादिवशी ते निर्णय घेतील,
– खासदार डॉ. कल्याण काळे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस कमिटी
संधी दिल्यास आनंदच
मंगळवारी पदभार स्वीकारल्यानंतर नवे प्रदेशाध्यक्ष राज्यातील पदाधिका-यांची बैठक घेतील. कोण काम करतोय, कोण कामचुकारपणा करतोय याची माहिती घेतील. जो काम करेल त्यालाच संधी मिळेल. मला पुन्हा संधी दिल्यास मला आनंदच होईल.
– शेख युसूफ, शहर-जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
महापालिकेसाठी मोर्चेबांधणी
सध्या महापालिका निवडणुकांच्या हालचाली सुरु आहेत. अशावेळी काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेत जरी महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसने चांगले काम केले असले तरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जोरदार पराभव झाला. यात काँग्रेसचीही सुमार कामगिरी राहिली. उमेदवार देण्यापासून ते प्रचार करण्यापर्यंत काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस समोर येत राहिली. यामुळे येत्या महापालिका निवडणुकांसाठी पक्षात मोठे फेरबदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नव्या चेहऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.