
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 'धान्य महोत्सव' प्रभावी मंच; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन (Photo Credit- X)
धान्य महोत्सव हा यासाठी प्रभावी दुवा ठरत आहे. या महोत्सवात विविध धान्ये, कृषी उत्पादने, प्रक्रिया उद्योगातील वस्तू तसेच पारंपरिक व स्थानिक उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात आले असून, शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संवाद साधला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होत आहे. ग्रामीण भागात उत्पादनवाढ होत असली तरी पाणीटंचाई, प्रदूषण आणि अपुरी पायाभूत सुविधा या समस्या अद्याप कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. या अडचणींवर मात करण्यासाठी जलसंधारण, पाइपलाइन कामे आणि प्रभावी पाणी व्यवस्थापनावर विशेष भर देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
शासनाच्या विविध योजनांद्वारे या बाबींवर सातत्याने काम सुरू असून, ग्रामीण भागात आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग व आत्मा यांच्या सहकार्याने प्रस्ताव तयार केल्यास शहरात कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती जोरी यांनी केले, तर आभार तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी मानले.
उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. महोत्सवात विविध धान्ये, कृषी उत्पादने तसेच महिला बचत गटांच्या वस्तूंचे सुमारे ७० स्टॉल उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी शास्त्रज्ञ डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. संजय पाटील, डॉ. दीप्ती पाडगावकर तसेच डाळिंब तज्ज्ञ डॉ. बी. टी. गोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा चव्हाण, प्रतिक्षा कापसे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, विकास कापसे, पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ, शुभम बारगळ, उमेश आवारे, सचिन पवार, उमेश आवारे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.