
शहागंजमध्ये महापालिकेचा 'बुलडोझर'! (Photo Credit- X)
शहरातील जुनी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहागंज चौकात फळबाजार आणि इतर व्यापाऱ्यांची दुकाने थाटली जातात. चौकाच्या चारही बाजुंनी हातगाड्यांच्या विळखात असते. त्याचबरोबर छोट्या व्यवसायिकांनी दुकानासमोर पाच ते सहा फूट रुंद वटे बांधून त्यावर शेड टाकून मोठा रस्ता अरुंद करुन ठेवला होता. दुकानासमोर कोणी दुचाकी लावल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. या कारणावरून चौकात अनेकदा वादावादीनंतर घटना घडल्या आहेत.
बुधवारी सायंकाळी एका दुकानदाराने गरोदर महिलेसह तिच्या पतीस जबर मारहाण केली होती. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे, नागरी मित्र पथकप्रमुख प्रमोद जाधव यांच्यासह कर्मचारी व पोलीस शहागंजमध्ये दाखल झाले. जेसीबी व ट्रकच्या ताफ्यासह सुरू झालेल्या कारवाईची चाहूल लागताच हातगाडी धारकांनी गाड्यावरील माल हलवला. अतिक्रमण काढताना व्यापाऱ्यांनी जेसीबीचालकाच्या अंगावर धावून जात विरोध करण्याचा प्रयत्न केला. अशीच दुसरी कारवाई आमखास मैदानासमोरील मार्गावर करण्यात आली.
किराणा चावडी पोलीस चौकीसमोर झाडाखाली लागणाऱ्या हातगाड्यांमुळे अडथळा होत असल्याने ते झाड तोडण्यात आले. पोलीस चौकीमागील गल्लीतील चप्पल मार्केटमधील गाळ्यांसमोरील अतिक्रमणावरही कारवाई करण्यात आली. दोन्ही मार्गावरील हातगाड्या हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढे रस्त्यावर व्यवसाय केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
बुधवारी काही फळ विक्रेत्यांनी एका तरुणासह त्याच्या पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली. पत्नी व तीन वर्षाच्या मुलीसह खरेदीसाठी आले असता दुचाकी लावण्यावरून वाद झाला, शिवीगाळ करत सात-आठ जणांनी खाली पाडून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.
रमजानव्या पार्श्वभूमीवर कारवाई केल्याचा आरोप फेटाळताना संतोष वाहुळे म्हणाले, दिवाळीच्या काळात गुलमंडी परिसरातही कारवाई करण्यात आली होती, प्रशासन भेदभाव करत नाही. रस्ता अडवून व्यवसाय करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यापुढे रस्त्यावर हातगाड्या लावल्यास त्या कायमस्वरूपी जप्त केल्या जातील, तसेच मालही जप्त करण्यात येईल असे धोरण राबविण्यात येणार असल्याचे वाहुळे यांनी सांगितले, व्यवसाय करावयाचा असल्यास भाजीमंडईत उपलब्ध जागा किंवा गाळे घ्यावेत, बेशिस्तपणामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असून गर्भवती महिलेला मारहाण झाल्याची घटना गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांना त्रास होऊ नये, हा प्रशासनाचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.