
‘विकसित भारतासाठी जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपा’; रविंद्र चव्हाण यांचं आवाहन
छत्रपती संभाजीनगर : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर ‘समरसता संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संत रविदास महाराज यांच्या जन्मभूमी वाराणसी येथील पवित्र माती कलशात घेऊन निघालेली कलश यात्रा ७ ऑगस्ट रोजी नागपूर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी या यात्रेचे स्वागत केले.
मुकुंदवाडी येथील संत रविदास मंदिरातून या कलश यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर सायंकाळी कासलीवाल मैदान येथे कलश पूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी संत रविदास महाराज तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत रवींद्र चव्हाण यांनी अभिवादन केले.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, “संत रविदास महाराजांनी जाती-धर्म या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन समता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्याच विचारांना पुढे नेत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. जाती-धर्माच्या भिंतींपलीकडे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समरसतेचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आणि सर्वांनी मिळून राष्ट्रभक्तीचा धागा जपणे आज गरजेचे आहे. ‘समरसता संकल्प अभियान’ ही त्याच व्यापक विचाराची वाटचाल आहे,” असे आ. चव्हाण यांनी सांगितले.
वाराणसी येथून सुरू झालेली ही कलश यात्रा जुलै २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत विविध टप्प्यांत राज्यभर प्रवास करणार आहे. संत रविदास महाराजांच्या जन्मभूमीची पवित्र माती राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी कलश पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल. या माध्यमातून संत रविदास महाराजांचा समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा संकल्प आहे.
या कलश यात्रेच्या स्वागत व पूजन सोहळ्यास भाजपचे राष्ट्रीय महामंत्री दुष्यंत कुमार गौतम, जालना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार किसन वानखेडे, आमदार संतोष दानवे, प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक, आमदार सुहास शिरसाठ, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार तथा प्रदेश चिटणीस राम सातपुते, भाजपाचे छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष विश्वजीत गायकवाड, महापौर समीर राजूरकर, माजी आमदार संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह वारकरी, लिंगायत, वीरशैव, नाथ संप्रदाय, महानुभव पंथ तसेच वैष्णव संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.