
छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे हे आम्हाला गद्दार म्हणतात, मात्र खरे गद्दार हे उद्धव ठाकरे हेच असल्याचा गंभीर आरोप राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी उद्धव ठाकरेंवर केला. खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरात होते. त्यांच्या दौऱ्यापूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उबाठा यांच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, त्यांचे सहा खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज्यात दौरा सुरु केला आहे. हा दौरा फक्त आम्हाला टोमणे मारण्यासाठी आहे. खासदार गेले मात्र ते का गेले याचे कारण शोधण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. हा दौरा म्हणजे त्यांना उशिराने सूचनेलेले शहाणपण असल्याचे मंत्री शिरसाट म्हणाले. शिरसाट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत पुढे म्हणाले, पक्षाचे हे सहा खासदार फुटण्यामागे सर्वस्वी गद्दार उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी हेच आहेत.
ठाकरेंवर सडेतोड टिका
२०१९ साली जेव्हा निवडणूका झाल्या तेव्हा, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांचे त्यांना फोन येत होते. पहिले मुख्यमंत्री तुम्ही व्हा मात्र युती तोडू नका, असे ते विनंती करत होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांचे ऐकले नाही. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत भांडणात शिवसेनेप्रमुखांनी त्यांची हयात घालवली त्यांच्याचसोबत उद्धव ठाकरेंनी युती केली, मग खरा गद्दार कोण? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदेंनी अखेरपर्यंत शिवसेना आणि भाजपला जोडण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे युती तोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी सुरूच ठेवला. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणताना आपणही गद्दारच आहोत याची जाणीव त्यांनी ठेवावी, अशी सडेतोड टीका शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
“शिवसेनेचे खासदार फोडण्यामागे मोठे राजकारण”
उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की, शिवसेनेचे खासदार फोडून त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात आले. यामागे केंद्रीय नेतृत्वाचे राजकीय गणित असू शकते, असा दावा त्यांनी केला. “हा माझा आरोप नाही, हा माझा समज आहे. तो खरा असू शकतो किंवा नसू शकतो. पण निवडणुका नसताना खासदार फोडण्याची गरज काय होती?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.