
आषाढीला अन्नासह सोशल मीडियाचाही उपवास! विठ्ठलनामात रमण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे भक्तांना अनोखे आवाहन
आषाढी एकादशी अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपली असून शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये एकादशीच्या पूर्वसंध्येलाच ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च गजर होणार आहे. शुक्रवारी
सायंकाळी तसेच शनिवारी पहाटे अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमातून कलावंत आपली सेवा श्री विठ्ठलचरणी अर्पण करणार आहेत. दरम्यान, एकादशीच्या दिवशी केवळ अन्नाचाच नव्हे, तर मोबाईल आणि सोशल मीडियाचाही ‘डिजिटल उपवास’ करून विठ्ठल नामात तल्लीन व्हावे, असे आवाहन विविध मंदिरांच्या विश्वस्त मंडळांनी केले आहे.
मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. मात्र, दर्शनाच्या रांगेत किंवा मंदिर परिसरात मोबाईल, सोशल मीडिया, रील्स पाहणे किंवा छायाचित्रण करण्यात अनेकजण व्यस्त असल्याने भक्तीच्या वातावरणात व्यत्यय येतो. ही बाब लक्षात घेऊन यंदा ‘डिजिटल उपवास’ ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. भाविकांनी शक्यतो मोबाईल घरी किंवा वाहनात ठेवून संपूर्ण दिवस विठ्ठल नामस्मरणात व्यतीत करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धावणी मोहल्ला (शहागंज), ज्योतीनगर, जयसिंगपुरा, पंढरपूर गाव, सुधाकरनगर यांसह शहरातील अनेक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. या आवाहनाला भाविकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. शिस्तबद्ध दर्शनासह काही काळ मोबाईलपासून दूर राहून भक्तीचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
शहरातील २० ते २५ विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात काही काळ मोबाईलपासून दूर राहून शांतचित्ताने दर्शन घेतल्यास भक्तीचे वातावरण अधिक पवित्र व प्रसन्न राहील, अशी भावना शहरातील अनेक भाविकांनी व्यक्त केली.
आषाढी एकादशीच्या दिवशी बहुतांश मंदिरांचे दरवाजे पहाटे ५ वाजल्यापासून दर्शनासाठी खुले राहणार आहेत. पहाटे महाआरतीनंतर रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू राहील. भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, फराळ, राजगिरा लाडू आदी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.