
अचानक वाढलेल्या वाशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग
बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर तुलनेने कमी असतानाही कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्याने वशिष्ठी नदीची पातळी वेगाने वाढू लागली. काही वेळातच एनरॉन पुलाजवळील एका घराभोवती पाणी साचले. बाहेर अंधार आणि पाण्याचा वाढता वेग यामुळे कुटुंबातील सदस्य घाबरून गेले. घराबाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने त्यांनी मदतीची प्रतीक्षा सुरू केली.
Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले
परिसरातील नागरिकांनी ही बाब नगरसेवक प्रमोद बुरटे यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच नगराध्यक्षांनी वेळ न दवडता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी समन्वय साधत नगरपालिका पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पाण्याचा वेग प्रचंड असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, दोरी, सुरक्षासाहित्य आणि स्थानिकांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने बचाव मोहीम राबवली. अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना एकामागोमाग एक सुरक्षित बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
कुटुंबाची सुखरूप सुटका झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात नगराध्यक्ष उमेश सकपाळ, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बचावकार्यात सहभागी सर्वांचे स्वागत केले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे एका कुटुंबाला नवजीवन मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढाम्बकर, नगरसेवक प्रमोद बुरटे, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, माजी नगरसेवक रतन पवार, सुयोग चव्हाण, दयानंद जुवळे, निलेश किंजळकर, अजय कासारे, गोट्या मोहिते, इकबाल इरफान, सिद्धेश रेडीज, निखिल शेट्टी तसेच स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.
या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा वाढता जोर आणि नदीच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेता नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासन, लोकप्रतिनिधी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक नागरिक यांच्यातील समन्वय व तत्परता किती महत्त्वाची असते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.