
CM Devendra Fadnavis on Sand Smuggling in Beed Allegedly Ongoing with Police Complicity
Maharashtra Politics : मुंबई : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कथित पोलिसांच्या संगनमतातून सुरू असलेल्या वाळू तस्करी प्रकरणात संशयित तीन व्यक्तींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुनर्प्राप्त करण्यात आला आहे. (Maharashtra News) मात्र या सर्व डेटाच्या विश्लेषणानंतरही संबंधितांमधील थेट संगनमत किंवा परस्पर संबंध सिद्ध करणारे ठोस पुरावे मिळाले नाहीत. तरीही या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सर्व संभाव्य बाबींची सखोल चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सांगितले.
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पोलिसांच्या संगनमताने वाळू तस्करी सुरू असल्याबाबत सदस्य प्रकाश (दादा) सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य नाना पटोले, अर्जुन खोतकर यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यात लोकल क्राइम ब्रँच (एलसीबी) तसेच गुन्हे अन्वेषणासाठी विशेष पथके कार्यरत असून, विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा सातत्याने काम करत आहे. काही ठिकाणी गैरव्यवहारांच्या तक्रारींचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी निकष निश्चित करण्यात आले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.”
हे देखील वाचा : “पतीच्या मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार…”: Ashok Kharat प्रकरणात CM फडणवीसांचे निवेदन
यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती दिली की, “या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) कारवाई करण्यात आली असून संबंधित हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. जप्त मोबाईलचा फॉरेन्सिक अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यात आरोपी व पोलीस निरीक्षक यांच्यात आक्षेपार्ह संभाषण आढळलेले नाही.” तपासाच्या पार्श्वभूमीवर संबंधित पोलिस निरीक्षकाला नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले होते, जेणेकरून चौकशीवर कोणताही प्रभाव पडू नये. अहवालानंतर त्याचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याची पुन्हा बदली करण्यात आल्याचेही राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितले.
हे देखील वाचा : महिला आयोग अध्यक्षानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद देखील जाणार? रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,“नीरज जाधवाच्या सहभागाबद्दल पुरावा आढळून आला नाही. 2024 मध्ये शिर्डीमधील एका महिलेने तक्रार दाखल केली. काही व्हिडिओ तपास अधिकाऱ्यांना दाखवले असता त्यामध्ये 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले. यामध्ये अशोक खरातने जादूटोणा, भोंदूगिरी, तंत्रमंत्र वापरुन अनेक महिलांशी बलात्कार, अश्लील चाळे केल्याचे समोर आले. हे समोर आणणाऱ्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताची भीती होती.”
जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार अशोक खरातवर गुन्हे
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “17 मार्चला एका महिलेने खरातविरुद्ध तक्रार दिली. तंत्रमंत्र करत दैवी शक्ति असल्याचे खरातने सांगितले. आरोपी देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. पतीच्या मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार बलात्कार केला गेला. नरबळी, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार अशोक खरातवर गुन्हे दाखल आहेत. खरातच्या घरातून लॅपटॉप, रोकड जप्त करण्यात आली.” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिली आहे.