
Devendra Fadnavis
मुंबई : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे राज्याच्या प्रशासनाला युवा पिढीच्या नव्या दृष्टिकोनासह नावीन्यपूर्ण कल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फेलोशिपच्या माध्यमातून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग करून फेलोंनी आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या ॲप्रिसिएशन आणि नवीन बॅचच्या कमेन्समेंट कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, आयआयटीचे प्राध्यापक, कार्यक्रमाचे समन्वयक आणि सीएम फेलोज उपस्थित होते.
प्रशासनात अनुभवी आणि गुणवत्तापूर्ण अधिकारी असले तरी दीर्घकाळ एकाच पद्धतीने काम केल्याने कल्पकता आणि प्रत्यक्ष परिस्थितीशी असलेला संपर्क काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनात नवीन विचार आणणे आणि तरुणांना शासनाच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती देणे, हा फेलोशिप कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील 99 हजार फेरीवाल्यांना मिळणार QR कोड ओळखपत्र; पालिकेच्या निर्णयावर विरोधकांचा सवाल
फेलोशिप हा केवळ तरुणांसाठीचा अनुभव नसून प्रशासनालाही त्यातून नवीन दृष्टिकोन मिळतो. नवीन पिढीच्या आकांक्षा समजून घेतल्याशिवाय सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख प्रशासन उभारता येणार नाही. त्यामुळे बदल स्वीकारून प्रशासन अधिक गतिमान करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
स्टार्टअप धोरण, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, जिल्हास्तरीय वॉर रूम्स, विविध डॅशबोर्ड्स, जलयुक्त शिवाराचे GIS मॅपिंग, ‘मागेल त्याला शेततळे’, ई-गव्हर्नन्स, तक्रार निवारण व्यवस्था, चॅटबॉट्स आणि महाराष्ट्र युनिक इन्फ्रा आयडी यांसारख्या उपक्रमांमध्ये सीएम फेलोंनी योगदान दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
शासनाच्या १०० आणि १५० दिवसांच्या कार्यक्रमांमध्येही फेलोंनी भूमिका बजावली. आवास योजना, समृद्ध पंचायत राज अभियान, लखपती दीदी, शेतकरी व महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच आदिवासी भागातील शिक्षण आणि आरोग्यविषयक कामांमध्येही त्यांनी योगदान दिल्याचे फडणवीस म्हणाले.
प्रशासनात बदल घडवण्यासाठी प्रत्येक वेळी शासन निर्णयाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आधी लोकाभिमुख आणि सोपी कार्यपद्धती स्वीकारून त्यानुसार शासन निर्णय करण्याची कार्यसंस्कृती विकसित झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी
‘मी एकटा किती परिवर्तन करू शकणार?’ असा विचार न करता परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी. फेलोशिपमधून मिळालेला अनुभव समाजाच्या गरजा आणि आकांक्षा समजून घेण्यासाठी वापरावा आणि आपल्या कार्यक्षेत्रात ठोस बदल घडवावा, असे आवाहन त्यांनी केले.
नवीन बॅचमधील फेलोंनी मागील बॅचपेक्षा अधिक नावीन्यपूर्ण आणि प्रभावी काम करण्याचे लक्ष्य ठेवावे, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.