
आंबा-काजू उत्पादकांना भरपाई देऊ : फडणवीस
कोकणातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
वातावरणामुळे बागायतदारांना मोठा फटका
सिंधुदुर्गनगरी: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले. मुंबई येथील विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, भास्कर जाधव, महेंद्र दळवी, किरण सामंत, संबंधित मंत्री उपस्थित होते.
कोकणातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
दरम्यान, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात दिलेले आश्वासनाची पूर्तता होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यामध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या नुकसानीची भरपाई समाधानकारक पद्धतीने दिली जाईल. विशेष म्हणजे, ही नुकसानभरपाई याच आर्थिक वर्षात देण्याचा सरकारचा निर्धार असल्याने मुख्यमंत्रि फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ऐन पाडव्याला हापूस महाग; उत्पादनात मोठी घट झाल्याने दरात उसळी
ऐन पाडव्याला हापूस महाग
यंदाच्या हंगामात हवामानातील अनिश्चितता आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे हापूस आंबा उत्पादनात मोठी घट झाली असून, ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावरच आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत. कोकणातील उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज व्यक्त होत असून, बाजारात आवक कमी झाल्याने ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
हेदेखील वाचा : Alphonso Mango: आंबा, काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा; मंत्री नितेश राणे काय म्हणाले?
पुणे मार्केटयार्डात सध्या हापूसची आवक अत्यल्प आहे. दररोज केवळ १५० ते २०० पेट्यांचीच नोंद होत असून, गेल्या वर्षी याच कालावधीत दोन ते तीन हजार पेट्यांची आवक होत होती. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली असली, तरी पुरवठा अपुरा पडत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात हापूसचा दर डझनमागे सुमारे १,५०० ते ३,५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.