
भाजपा सरकार शेतकरी विरोधी, जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण; काँग्रेसची टीका
तुळजापूर : शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून, फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस खोटारडे आहेत, जेव्हा कर्जमाफी मिळेल तेव्हाच खरे, असे म्हणत शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते तुळजापूर शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेवेळी सपकाळ बोलत होते. सकाळी सुरु झालेल्या या यात्रेचा समारोप तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात सभेने झाला. LPG गॅस संकटाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी LPG गॅस ठेवलेले ट्रॅक्टर लोकांचे लक्ष वेधून घेत होते. दुपारच्या सत्रात तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सुरुवात झाली व त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची महाआरती करण्यात आली.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात भाजपा सरकारचा अनागोंदी कारभार सुरु आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांचे प्रश्न गंभीर आहेत, महागाई, बेरोजगारी वाढली आहे, LPG सिलेंडर व पेट्रोल, डिझेल मिळत नाही पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. देशात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न सुरु असून संविधानाची पायमल्ली करून गोलवळकरांच्या ‘बंट ऑफ थॉट’ला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचे षडयंत्र सुरु आहे तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रधर्माची पायमल्ली करत आहेत. या महाराष्ट्रधर्म बुडव्यांना आई तुळजाभवानी सुबुद्धी देवो व संविधानाला अभिप्रेत भारत घडू दे, असे साकडे घातल्याचेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हे सुद्धा वाचा : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला भीषण आग; मालवाहतूक करणारा ट्रक जळून खाक
खरात प्रकरण अशोभनीय व किळसवाणे
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराच्या राज्यात प्रतिगामी विचार फोफावत असल्याने खरात सारख्या भोंदूबाबांची संख्या वाढत आहे. अशोक खरात प्रकरणातून जे काही उघड होत आहे ते किळसवाणे असून महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन प्रकरणावर पडदा टाकता येणार नाही, तर यामध्ये जे मंत्री, आमदार, खासदार, सरकारी अधिकारी यांचा सहभाग आहे त्या सर्वांवर अंधश्रद्धाविरोधी कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे व या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण हे समोर आले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणाचा छडा लावल्याच्या फुशारक्या मारू नयेत. ८-९ महिन्यांपासून त्यांच्याकडे याची माहिती होती, तर एवढा वेळ ते काय झोपा काढत होते काय? असा प्रश्न विचारून महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.