
आंबा, काजू नुकसानग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती घोषित करा; राजू शेट्टींची मागणी
कोल्हापूर : राज्यांमधील आंबा आणि काजू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संकटाला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य कृष्ण वत्स यांच्याकडे केली.
आंबा आणि काजू लागवड हा महाराष्ट्र आणि कोकणच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. हवामानातील बदलांमुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे भविष्य आता अंधारात आहे. भारतीय शेतीला हवामान बदलाच्या संकटातून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने एका ‘राष्ट्रीय हवामान लवचिकता धोरणा’ची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. बागायतदारांचे झालेले हे नुकसान केवळ स्थानिक नसून हवामान बदलाशी संबंधित आहे. त्यामुळे या नुकसानीला राष्ट्रीय आपत्ती मानून (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) अंतर्गत तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.
हेदेखील वाचा : World War 3 : ड्रॅगनच्या दारात भारताचे ‘यमदूत’ ! BrahMos आणि Akashच्या जोडीने फिलीपिन्स अभेद्य; चीनच्या नौदलाला पळता भुई थोडी
राज्यामध्ये जवळपास ४.५० ते ५.०० लाख टन आंबा उत्पादन होते. यापैकी २ ते २.२५ लाख टन आंबा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्पादित होतो. यंदाच्या वर्षी जवळपास ९० टक्के आंब्याचे उत्पादन घटले असून, याबाबतचा अहवाल फलोत्पादन विभागाने सरकारला सादर केला आहे. दरवर्षी आंबा निर्यातीमधून ६०० कोटी तर आंबा पल्प निर्यातीमधून ६७० कोटी असे जवळपास १२७० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. यामुळे यंदाच्या वर्षी आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना अनुक्रमे हेक्टरी ५ व ३ लाख रुपयांची मदत करण्याची गरज आहे.
यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सदस्य कृष्ण वत्स यांनी याबाबत तातडीने संबंधित विभागाला सूचना देऊन तत्काळ केंद्रीय पथक घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवून त्यांचा पाहणी अहवाल मागवून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
हवामानातील अनिश्चितता आता दरवर्षीची बाब
हवामानातील अनिश्चितता आता दरवर्षीची बाब बनत चालली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग व शासनाने पारंपारिक मदती पलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान, अचूक हवामान अंदाज प्रणाली आणि सक्षम विमा कवच पुरवावे, जेणेकरून शेतकरी या संकटातून कायमस्वरूपी बाहेर पडू शकेल यासाठीच्या उपाययोजना करण्याची मागणी शेट्टी यांनी केली.