
Ministerial Convoy Reduction
Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी जनतेला इंधनाची बचत करण्याचे, विमान प्रवास टाळण्याचे, सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर वाढण्याचे, वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे देशाला आव्हान केल्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी खर्चामध्ये कपात करण्याच्या उद्देशाने, त्यांनी आपल्या अधिकृत ताफ्याचा (कॉन्व्हॉयचा) आकार निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटू लागल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला. या निर्णयामागे भारताच्या परकीय चलन साठ्यावर वाढत असलेला दबाव हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे, अशातच आज मुख्यमंत्री फडणवीसांनी आज मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. राज्यातील सर्व मंत्र्यांचे ताफे अर्ध्यावर ( Ministerial Convoy Reduction )करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
आज सकाळी मंत्रिमंडळाची एक बैठक झाल्यानंतर दुपारीदेखील एक बैठक होणार आहे. या बैठकीला पोलिस महासंचालक, मुख्य सचिव हेदेखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही बैठकीनंतर एकत्रित निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. मंत्र्यांच्या सुरक्षेशी तडजोड न करता ताफ्यातील वाहनसंख्येवर मर्यादा आणली जाऊ शकते. आजच्या दुपारच्या बैठकीनंतर एकत्रितपणे यावर निर्णय घेतला जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा दौरा रद्द केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रीया देताना सांगितले की, पंतप्रधानांनी देशहितासाठी चांगला निर्णय घेत जनतेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केलं आहे. प्रामुख्यांने ती आमचीही नैतिक जबाबदारी ठरते. मीसुद्धी इलेक्ट्रीक कारमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अध्यक्षांनी सांगितल्यानंतर जपानचा दौराही रद्द केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्यातील मंत्र्यांकडून प्रत्यक्ष कृती सुरू झाल्याचे दिसून येत आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू करत इंधन बचतीचा संदेश दिला आहे. पंतप्रधानांनी देशवासियांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार उदय सामंत यांनी प्रत्यक्ष कृतीतून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
तर मंत्री अतूल सावे यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी त्यांनी मंत्रालयात पायी जात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा, दुग्धविकास आणि दिव्यांग सक्षमीकरण मंत्री असलेल्या अतुल सावे यांच्यासोबत त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकारीही पायी मंत्रालयात दाखल झाले.
दुसरीकडे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी देखील इलेक्ट्रिक बोटींच्या वापराचे आवाहन केले आहे. “माझ्याकडे बंदर खाते असल्याने मी मच्छीमार बांधवांना आणि नागरिकांना डिझेल बोटींपेक्षा इलेक्ट्रिक बोटींचा वापर करण्याचे आवाहन करणार आहे. यासाठी लागणारी मदत आणि कर्ज मिळवून देण्यासाठी सरकार तयार आहे,” असे नितेश राणे यांनी सांगितले. तसेच, “माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या ७ ते ८ वरून आता ३ वर आणली आहे. तसेच माझी डिझेलवरील प्रशासकीय गाडी बदलून आता इलेक्ट्रिक गाडी घेणार आहे. आपण सर्वांनी सकारात्मक बदल स्वीकारले, तर देश लवकरच महासत्ता बनेल आणि मोदी सरकारचा हेतूही साध्य होईल,” असेही नितेश राणेंनी स्पष्ट केले.