
अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, बारवे परिसरातील संबंधित जमीन एका शेतकऱ्याच्या नावावर होती. ६ ऑगस्ट रोजी या जमिनीच्या फेरफार नोंदीमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यासोबत त्याच्या एका महिला नातेवाईकाचे नावही फेरफार नोंदीत समाविष्ट करण्यात आले आणि त्यानंतर सातबारा उताऱ्यावरही तिचे नाव नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या एका तासात झाल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Kalyan: ‘दृश्यम’ स्टाईल प्रियकराची हत्या, फ्लॅटमध्ये सडलेला मृतदेह अन् घरमालकाला दिला व्हॉईस मेसेज
या प्रकरणावर बोलताना प्रेमनाथ म्हात्रे यांनी कल्याण तहसीलदार विकास गरुडकर यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाबाबत तहसीलदारांकडे विचारणा केली असता आपल्यावर एका मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव असल्याचे सांगण्यात आले, असा दावा म्हात्रे यांनी केला आहे. मात्र, हा दावा संबंधित तहसीलदारांनी अधिकृतरीत्या मान्य केला आहे, असे सध्या स्पष्ट झालेले नाही.
म्हात्रे यांनी महसूल विभागाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करताना, सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनीच्या फेरफारासाठी साधारणपणे प्रक्रिया आणि हरकतीसाठी वेळ दिला जात असताना या प्रकरणात कोणतीही माहिती न देता तासाभरात प्रक्रिया कशी पूर्ण झाली? असा सवाल केला आहे.
या प्रकरणाची तक्रार घेऊन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेणार असल्याचे प्रेमनाथ म्हात्रे यांनी सांगितले आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित असतानाही आपल्यासोबत असा प्रकार होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करताना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले आहे. याशिवाय, खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून विकासक आणि शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करणारी टोळी कल्याणमध्ये सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशाच प्रकारच्या घटना आणखी काही व्यक्तींसोबत घडल्याची माहिती असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत कल्याण तहसीलदार विकास गरुडकर यांनी आपल्याला या प्रकरणाची संपूर्ण माहिती नसल्याचे सांगितले आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील माहिती दिली जाईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता सातबारा फेरफाराची प्रक्रिया नेमकी कोणत्या नियमांनुसार आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आली, तसेच अवघ्या एका तासात ही नोंद कशी झाली, याचा तपास झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके सत्य समोर येणार आहे.
Ramesh Mhatre Arrest: महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक