
जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव ठप्प; कळंब-लातूर मार्गावर रास्ता रोको, टायर जाळल्याने तणाव
जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ, व्यापारी संकुले आणि विविध व्यावसायिक आस्थापना बंद राहिल्याने दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला. मात्र, दवाखाने, शासकीय कार्यालये आणि बँका यांसारख्या अत्यावश्यक व सार्वजनिक सेवा सुरू होत्या. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची काही प्रमाणात वर्दळ होती.
मेजर ध्यानचंद महान खेळाडू क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा; इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचा उपक्रम
दरम्यान, कळंब–धाराशिव–लातूर राज्य मार्गावर मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली असतानाच मराठा समाज बांधव पुन्हा रस्त्यावर उतरल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलकांनी दिवसभर रास्ता रोको करून मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेची धावपळ वाढली.
कळंब–ढोकी रस्त्यावरही आंदोलनाची धग जाणवली. या मार्गावर ठिकठिकाणी अज्ञात गावकऱ्यांनी टायर जाळल्याची माहिती आहे. टायर जाळल्यामुळे काही काळ रस्त्यावर धुराचे लोट पसरले आणि वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आंदोलन शांततेत पार पडावे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजाकडून बंद, रास्ता रोको आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
धाराशिव शहरातील कडकडीत बंद आणि राज्य मार्गावरील रास्ता रोको आंदोलनामुळे जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनाला पुन्हा एकदा व्यापक स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र आहे. आता सरकार या आंदोलनाची कशी दखल घेते आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणती भूमिका जाहीर करते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.