
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिवचा डंका! (Photo Credit- X)
जिल्हाधिकारी पुजार यांच्या कुशल नेतृत्व, दूरदृष्टी आणि परिणामकारक नियोजनामुळे धाराशिव जिल्ह्याने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख केले असून याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.
१५० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आल्या. यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड, तुळजाई चॅटबॉट, कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर प्रणाली तसेच जीवनरेखा प्रणाली या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे. डिस्ट्रिक्ट डॅशबोर्डमुळे विविध शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले असून निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर प्रणालीमुळे शासन निर्णय व परिपत्रकांची अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक अचूक आणि जलद झाले आहे.
जीवनरेखा प्रणालीद्वारे शेत रस्त्यांची नोंद व व्यवस्थापन सुलभ झाले असून ग्रामीण भागातील तक्रारींचे प्रभावी निराकरण होत आहे. तुळजाई चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांची माहिती घरबसल्या उपलब्ध होत असून सेवा वितरण अधिक सुलभ, जलद आणि विश्वासार्ह झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या व्यापक वापरामुळे पेपरलेस कार्यालय संकल्पना प्रत्यक्षात येत असून प्रशासनाची कार्यक्षमता वाढली आहे.
या यशामागे जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी नमूद केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर प्रशासनात वाढवून कामकाज अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी उपलब्ध डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी पुजार यांनी केले.