
अखेर शेतकऱ्याला न्याय! कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या सोसायटी व बँकेला ग्राहक आयोगाचा दणका
पवारवाडी (ता. धाराशिव) येथील पांडुरंग रामलिंग मुंढे आणि शालूबाई पांडुरंग मुंढे यांनी ३ एप्रिल २०१४ रोजी ऊस पिकासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून पीककर्ज घेतले होते. त्यानंतर राज्य शासनाने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी लागू केली. त्यानुसार मुंढे दाम्पत्याने २४ ऑगस्ट २०१७ रोजी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्जही सादर केला.
मात्र, सर्व निकष पूर्ण करूनही संबंधित सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चुकीमुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. याबाबत त्यांनी अनेकदा पाठपुरावा केला. सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनीही संबंधित संस्थांना नियमानुसार कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत पत्रव्यवहार केला; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.
अखेर ॲड. धर्मराज नवनाथ सोनवणे यांच्या माध्यमातून मुंढे दाम्पत्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, धाराशिव येथे तक्रार दाखल केली. सुनावणीदरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर करत अर्जदारांनी संबंधित संस्थांच्या निष्काळजीपणामुळे आपण कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे आयोगासमोर सिद्ध केले. पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत ३० जून रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रार मंजूर केली. आयोगाने विविध कार्यकारी सेवा सोसायटी, वाघोली (वरूडा) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संबंधित पीककर्जाबाबत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार बेबाकी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.
याशिवाय, अर्जदारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल १० हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये, अशी एकूण २० हजार रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत. या प्रकरणात ॲड. धर्मराज नवनाथ सोनवणे यांनी अर्जदारांची बाजू मांडली. त्यांना ॲड. प्रतिक्षा सारूक-सोनवणे आणि ॲड. सचिन डी. कांबळे यांनी सहकार्य केले.
ग्राहक आयोगाच्या या निर्णयामुळे शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र असूनही प्रशासकीय चुका, निष्काळजीपणा किंवा विलंबामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळविण्याचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित संस्था जबाबदार धरल्या जाऊ शकतात, असा स्पष्ट संदेश या निकालातून गेला आहे.
Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ