शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!
मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दिलेली ओढ आणि उघाडीमुळे पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली असून, शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. पावसाचा हा खंड असाच लांबल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पारंपारिक पीक पद्धतीत मोठा बदल केला आहे. विशेषतः कमी दिवसांत येणाऱ्या किंवा चाऱ्याची सोय करणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.
जिल्ह्यात मक्याचा पेरा सरासरीपेक्षा कितीतरी पटीने वाढला आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ७७,९९९ हेक्टर असताना प्रत्यक्ष ९९,५६५.५७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुग्धव्यवसायासाठी लागणारा चारा आणि बाजारातील नगदी उत्पन्न यामुळे मक्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
कडधान्यांमध्ये शेतकऱ्यांनी तुरीवर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. सरासरीच्या तुलनेत तुरीची पेरणी ७४,७३६.२७ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. अंतरपीक आणि मुख्य पीक अशा दोन्ही स्वरूपात तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.
जिल्ह्याचे मुख्य नगदी पीक असलेल्या सोयाबीनची १,५५,०५५.०९ हेक्टर (८६.८६%) तर कापसाची १,३३,०६४.६५ हेक्टर (८५.६७%) क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
पावसाच्या सुरुवातीच्या अनियमिततेचा फटका मुगाच्या पेरणीला बसला आहे. वेळेवर पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी मुगाकडे पाठ फिरवत मका व सोयाबीनचा पर्याय निवडला.
मुगाचे क्षेत्र घटले- मुगाची केवळ ३४.७२% तर उडदाची ५३.१८% पेरणी झाली आहे. बाजरीची स्थिती- जिल्ह्याचे पारंपरिक पीक असलेल्या बाजरीची केवळ ४६.६७% (४१,८३२.६ हेक्टर) पेरणी झाली आहे. भात लागवड- अकोले तालुक्यात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या भात पिकाची १६.६३% (३,११६.५८ हेक्टर) पेरणी झाली आहे. तालुक्यातील १९५० हेक्टरवर रोप तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, मोठ्या पावसाच्या आगमनानंतर पुनर्लागवडीला वेग येईल. नवीन ऊस लागवड- जिल्ह्यात १८,५९४.८ हेक्टर (१३.९५%) क्षेत्रावर नवीन उसाची लागवड पूर्ण झाली आहे.
पावसाची आकडेवारी आणि हवामानाचा अंदाज- जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यातील पावसाची स्थिती अत्यंत विषाम राहिली आहे. जून महिन्यात सरासरी १०८.२ मि.मी. पावसाची गरज असताना प्रत्यक्ष केवळ ४६.८ मि.मी. (४३.६%) पाऊस पडला. जुलै महिन्यात १ ते २० जुलै दरम्यान एकूण ९७.५ मि.मी. (१००%) पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर आणि मुसळधार नसल्याने केवळ हलक्या सरींवर पेरण्या उरकण्यात आल्या. सध्या संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ हवामान असले, तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
| कालावधी / महिना | सरासरी पाऊस | प्रत्यक्ष झालेला पाऊस | टक्केवारी |
|---|---|---|---|
| जून महिना | १०८.२ मि.मी. | ४६.८ मि.मी. | ४३.६% |
| १ ते २० जुलै | ९७.५ मि.मी. | ९७.५ मि.मी. | १००% |
सध्या खरिपातील मूग व उडीद पिके वाढीच्या आणि फुलोरा टप्प्यात आहेत. उर्वरित पिके उगवण व बाल्य अवस्थेत आहेत. पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ मंदावली असली, तरी शेतात सध्या कोळपणी, निंदणी आणि पूर्वमशागतीची कामे वेगाने सुरू आहेत.
जिल्ह्यात सध्यातरी कुठेही दुबार पेरणीचे संकट नाही. काही भागांत पावसाच्या अभावाने पिकांची वाढ मंदावली असली, तरी प्रत्यक्ष उगवण समाधानकारक आहे. येत्या काही दिवसांत पावसाने जोर धरल्यास उर्वरित २१% क्षेत्रावरील पेरण्याही पूर्ण होतील.”
-सुधाकर बोराळे, जिल्हा कृषी अधिकारी, अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणावर मात करत पेरण्या ७९.३८ टक्क्यांपर्यंत नेल्या आहेत. मका आणि तुरीच्या वाढत्या टक्क्यावरून शेतकरी सुरक्षित आणि नगदी पिकांकडे वळल्याचे स्पष्ट होते. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आभाळाकडे लागले असून, पिकांना नवसंजीवनी देण्यासाठी जोरदार पावसाची अत्यंत गरज आहे.






