
धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास (Photo Credit- X)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्यासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. नव्या उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून पर्यटनाला चालना मिळेल. टेक्स्टाईल पार्क, एमएसएमई हब आणि तीर्थक्षेत्र विकास या त्रिसूत्रीमुळे जिल्ह्याचा औद्योगिक व पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
कौडगाव एमआयडीसीमध्ये प्रस्तावित टेक्निकल टेक्स्टाईल पार्कमुळे मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कापसावर जिल्ह्यातच प्रक्रिया झाल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल. गारमेंट युनिट्स व प्रक्रिया उद्योगांमुळे स्थानिक महिला आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
एमएसएमई पार्कसाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून, सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव एमआयडीसीतील प्रस्तावित एमएसएमई पार्कमुळे स्थानिक उद्योजकांना भांडवली व तांत्रिक बळ मिळणार आहे. यामुळे धाराशिव जिल्हा भविष्यात लघुउद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोथल, धौलावीरा, राखीगढी यांसारख्या १५ पुरातत्त्वीय स्थळांना ‘अनुभवजन्य सांस्कृतिक पर्यटन’ केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय म्हणजे तेर येथे सुरू असलेल्या कामाला राष्ट्रीय मान्यता असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. यामुळे तेरच्या पुरातन वारशाचे जतन, पर्यटनमूल्यवाढ आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून तेरचे सांस्कृतिक महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित होणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘टेम्पल टाऊन’ संकल्पनेचा सर्वाधिक लाभ तीर्थक्षेत्र तुळजापूरला होणार आहे. धार्मिक पर्यटनासोबत रस्ते, निवास व्यवस्था व स्वच्छतेसारख्या पायाभूत सुविधांचा विकास होईल. ‘नॅशनल डिजिटल नॉलेज ग्रिड’च्या माध्यमातून तुळजापूर संस्थान, नळदुर्ग किल्ला आणि प्राचीन तेरचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. आयआयएमच्या सहकार्याने १० हजार पर्यटन मार्गदर्शक तयार करण्यात येणार असून त्यात तुळजापूर, तेर व येडशी येथील तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे.
मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे धाराशिव जिल्ह्याच्या दळणवळणाला नवी दिशा मिळणार असून व्यापार व सेवा क्षेत्रालाही मोठी गती मिळेल, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
नव्या औद्योगिक व पर्यटन धोरणामुळे धाराशिव जिल्हा आता केवळ कृषीप्रधान न राहता औद्योगिक आणि सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे. शेती, उद्योग आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांतून जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होऊन शाश्वत विकासाचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली