
Shivshahi Bus Fire (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
एमएच ०६ बीडब्ल्यू-०४७१ क्रमांकाची शिवशाही बस धुळ्याकडे येत असताना इंजिनातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच धुराचे आगीत रूपांतर झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चालक राहुल रमेश चव्हाण यांनी बस तत्काळ रस्त्याच्या कडेला उभी केली. वाहक साजिद महमंद यांच्या मदतीने सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले. प्रवासी बाहेर पडताच काही मिनिटांत संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. या दुर्घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. चालक आणि वाहक यांनी कर्तव्यदक्षता दाखवली; मात्र वारंवार जळणाऱ्या शिवशाही बसांमुळे एसटीच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच धुळे महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बस जवळपास पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी अंतिम कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेने पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यापूर्वीही शिवशाही बसांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरीही तांत्रिक तपासणी, फिटनेस ऑडिट आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत ठोस बदल का होत नाहीत ? प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबणार कधी, असा सवाल आता प्रवासी उपस्थित करू लागले आहेत.