
ओमराजे निंबाळकर धाराशिवला पोहोचण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंचा माजी मंत्र्याला आदेश, नेमकं काय घडतंय?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सतत खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटातील शिवसेने (UBT) मध्ये आंतरिक संघर्ष तीव्र झाला आहे. पक्षातील ६ बंडखोर खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले आहे. या खासदारांची मनधरणी करण्याचे काम शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू आहे. सतत संपर्क साधला जात आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना धाराशिवकडे रवाना होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ओमराजे निंबाळकरही आपली भूमिका लवकरच जाहीर करणार आहेत. धाराशिवमध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आता ऑपरेशन टायगरची जबाबदारी तानाजी सावंत यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी सावंतांना मोठे आदेश दिले आहेत. ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना धाराशिवकडे रवाना होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तानाजी सावंत हे ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत राहणार आहेत, तशा शिंदेंच्या सूचना आहेत. तानाजी सावंत पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे. सोमवारी येतो, असा निरोपही मातोश्रीवर ओमराजे निंबाळकर यांनी दिल्याची माहिती आहे. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत राहण्याचे आदेश तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
ओमराजे यांना पुण्यातून दिल्लीला आणण्याची जबाबदारी सावंत यांच्यावरच होती. तेच या ऑपरेशनला लीड करत होते. आता ओमराजे यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याचं समजताच ते तत्काळ धाराशिवच्या दिशेनं रवाना झाले आहेत. ते धाराशिवला ओमराजे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. ओमराजे आज सकाळी पुण्याहून धाराशिवला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा आहे. धाराशिवला पोहोचल्यानंतर ओमराजे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.
हे सुद्धा वाचा : ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
सोमवारी मातोश्रीवर येऊन वैयक्तीक भूमिका मांडतो, असेही ओमराजे निंबाळकर यांनी निरोप दिल्याची माहिती मिळत आहे. ओमराजे निंबाळकर आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या अगोदरच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून मातोश्रीवर येण्याचे आश्वासन देण्यात आले. ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनीही चर्चा केली.