
वेगाने विकसित होतेय उंब्रज गाव
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची केली जातेय मागणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले गेले निवेदन
उंब्रज: पुणे–बंगळुरू आशियाई महामार्गावरील वेगाने विकसित होत असलेल्या उंब्रज गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उंब्रज ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची मागणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचा शेरा मारल्याने उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्याच्या आशा अधिक बळावल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावाच्या दौऱ्यावर आले असताना जिल्हा परिषद निवडणुकीतील शिवसेना उमेदवार ॲड. महादेव साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी इंद्रजित जाधव, अतुल पाटील, सचिन जाधव, सुशांत इनामदार, महेश मानकर, अमित पाटील, बाळासाहेब भोसले आणि मधुकर जाधव आदी उपस्थित होते. या प्रतिनिधीमंडळाने उंब्रज गावाच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि नागरी समस्यांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडला.
Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास
सध्या उंब्रज ग्रामपंचायत हद्दीत अंदाजे ३५ ते ४० हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. वाढती लोकसंख्या, व्यापारी हालचाली आणि शहराकडे झुकणारी जीवनशैली यामुळे ग्रामपंचायतीवर नागरी सुविधांचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या मर्यादित अधिकारांमुळे आणि निधीच्या कमतरतेमुळे अनेक मूलभूत समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्या आहेत.
उंब्रजमध्ये सध्या घनकचरा व्यवस्थापनासाठी कोणताही सक्षम प्रकल्प उपलब्ध नाही. परिणामी तारळी नदीकाठ परिसर कचरा डेपो बनत चालला आहे. या कचऱ्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या अनेक गावांना दूषित पाणीपुरवठा होण्याचा धोका वाढला आहे. याशिवाय गावातील बाजारपेठेत आवश्यक नागरी सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुलाची सोय नसल्याने व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोग्य सेवा देखील मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्याने नागरिकांना उपचारासाठी अन्य शहरांवर अवलंबून राहावे लागते. अग्निशमन केंद्राचा अभाव असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता कायम आहे. अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण आणि नागरी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक निधी मिळण्यातही अडथळे येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वसलेले उंब्रज हे कराड-पाटण परिसरातील महत्त्वाचे व्यापारी आणि वाहतूक केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे भविष्यातील नियोजनबद्ध विकासासाठी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायतीची रचना आवश्यक असल्याचे मत शिष्टमंडळाने मांडले.
नगरपंचायतीसंदर्भातील प्रस्ताव सध्या नगरविकास खात्याकडे प्रलंबित असून तो तातडीने मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली. या सर्व बाबींचा आढावा घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही व्हावी, असा स्पष्ट शेरा मारला. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे उंब्रजच्या नगरपंचायतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यास पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, रस्ते आणि व्यापारी विकासाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक आणि व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण उंब्रज परिसराचे लक्ष लागले आहे.