
'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?' चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; 'रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती'
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीनंतर महायुतीमध्ये शिंदे गटाचे खासदार सर्वाधिक झाल्याने एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या चर्चांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना फारसे महत्त्व नसल्याचे सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागा लागतात आणि ज्या पक्षाकडे स्वतःचे १३७ निवडून आलेले आमदार आहेत, त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहणार की दुसऱ्या पक्षाचा? अर्थात त्याच पक्षाचा राहणार. त्यामुळे कितीही कहाण्या तयार झाल्या तरी वास्तव मला माहिती आहे आणि शिंदे साहेबांनाही माहिती आहे. अशा बातम्यांमुळे ना मी विचलित होतो, ना शिंदे साहेब.”
RTI नियमांवरील वादानंतर सरकारचा यू-टर्न; अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश, बदलांना स्थगिती
ते पुढे म्हणाले, “प्रत्येकाला आपली स्वप्ने पूर्ण व्हावीत असे वाटते. त्यात काही गैर नाही.” या वक्तव्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही बंडखोर नेत्यांनी ‘विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यामुळे आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला’ असे कारण दिले होते. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “निधी हे अनेक कारणांपैकी एक कारण असू शकते. मात्र पक्षांतर केवळ निधीपुरते मर्यादित नसते. विकास प्रकल्प, सामाजिक प्रश्न आणि सत्ताधारी किंवा विरोधी पक्षात असण्याचाही त्यावर परिणाम होतो.”
पक्षांतरामागील इतर कारणांवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “जेव्हा नेतृत्व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात कमी पडते किंवा भविष्यात आपले राजकीय भविष्य सुरक्षित राहणार नाही, अशी भावना निर्माण होते, तेव्हाही नेते आणि कार्यकर्ते पक्ष बदलण्याचा निर्णय घेतात.”
शिवसेना ठाकरे गटातील अलीकडील घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याने मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर भाजपची भूमिका स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.