
अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी
कराड : यंदाच्या खरीप हंगामात कराड तालुक्यात शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या, तर गेल्या आठ-दहा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. परिणामी, पेरणीची कामे पुन्हा ठप्प झाली असून, तालुक्यातील नियोजित क्षेत्रापैकी अवघ्या २४.६० टक्के क्षेत्रावरच खरीप पेरणी पूर्ण झाली आहे.
कराड तालुक्यात यंदा ३१ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ७ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिली असली, तरी जमिनीतील ओलावा कायम असल्याने ट्रॅक्टर व पेरणी यंत्रे शेतात उतरू शकलेली नाहीत. त्यामुळे उर्वरित क्षेत्रातील पेरणी अद्यापही संथ गतीने सुरू आहे.
विशेषतः भात लागवडीसह सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी आणि मका या पिकांच्या पेरण्यांवर प्रतिकूल हवामानाचा परिणाम झाला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकरी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम नेहमीपेक्षा उशिरा पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खरीप पेरणीची सद्यस्थिती (हेक्टरमध्ये)
एकूण नियोजित क्षेत्र : ३१,१२७ हेक्टर, पूर्ण पेरणी : ७,६५६ हेक्टर (२४.६० टक्के), पिकनिहाय पेरणी, भात : १,२२७ हेक्टर, खरीप ज्वारी : ३२५ हेक्टर, सोयाबीन : ३,०४४ हेक्टर, भुईमूग : २,३५८ हेक्टर, मका : २ हेक्टर, नवीन ऊस लागवड : २,०२२ हेक्टर.
मुंबईत पावसामुळे 12 जणांचा मृत्यू
सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे झालेल्या १२ जणांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त करत, शिवसेना आमदार (विधान परिषद) नीलम गोऱ्हे यांनी बाधित कुटुंबांसाठी मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली. राम मंदिराशी संबंधित वादावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, कोणत्याही स्तरावर काही अनियमितता झाली असल्यास, दोषींवर निष्पक्ष कारवाई केली जावी.