
Farmers oppose solar agricultural pump scheme by shutting down traditional electricity connections
Satara News: वाई : महावितरण कंपनीच्या नवीन कृषी पंप धोरणाविरोधात वाई तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी थेट सोलर पॅनेलची प्रतिकृती घेऊन आंदोलन केले. पारंपरिक वीज कनेक्शन बंद करून थेट सौर ऊर्जेवर चालणारे ७.५ एच.पी. क्षमतेचे पंप कनेक्शन देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील, विशेषतः वाई, सातारा आणि कराड तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेतीपंपांसाठी नवीन वीज कनेक्शन देणे पूर्णपणे थांबवले आहे. याला पर्याय म्हणून शासनाने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत ७.५ एच.पी. क्षमतेपर्यंतचे सौर पंप देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वीज वितरण व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा असला तरी, या धोरणाने अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः सातारा जिल्ह्यात, शेतकरी नदी किंवा कॅनॉलमधील पाण्याचा उपसा करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून परवाना घेतात. पूर्वी या परवान्याच्या आधारावर पोलवर मीटर बसवून वीज कनेक्शन मिळत असे.शासनाने केवळ ७.५ एच.पी. क्षमतेपर्यंतचे सौर पंप देण्याचा निर्णय घेतला आहे.नदीपात्रातून पाणी उपसा करणाऱ्या परवानाधारक शेतकऱ्यांसाठी नवीन वीज कनेक्शन कसे देण्यात येणार, याबद्दल कोणतीही ठोस पॉलिसी महावितरणने अद्याप जाहीर केलेली नाही.
शेतकऱ्यांनी सोलर पॅनेलची प्रतिकृती घेऊन आंदोलन करत,शासनाचे लक्ष वेधले. नदीपात्रातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रणाली व्यावहारिक नाही. त्यांना पारंपरिक वीज कनेक्शनचीच आवश्यकता आहे.यावेळी उपस्थित असलेल्या विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य श्री. स्वप्निल भाई गायकवाड यांनी या धोरणातील त्रुटींवर बोट ठेवत, महावितरणने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली. संतोष तात्या गायकवाड, रुपेश मिसाळ, बाजीगर इनामदार, अमित चव्हाण, उमेश मोरे, किरण बागडे, सिद्धार्थ कांबळे आणि शंकर भणगे यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
महावितरणचे हे धोरण भूजल पातळीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असले तरी, नदी आणि कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी ते अन्यायकारक ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाटबंधारे विभागाचा पाणी उपसा परवाना आहे, त्यांना ७.५ एच.पी. पेक्षा जास्त क्षमतेच्या पंपासाठी पारंपरिक वीज कनेक्शन देण्याचा पर्याय तातडीने सुरू करावा.सौर पंप प्रणाली ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही (उदा. नदीपात्र, उंच हेड), अशा ठिकाणी पारंपरिक वीज कनेक्शनला प्राधान्य देणारी लवचिक पॉलिसी महावितरणने जाहीर करावी. मोठ्या शेतीसाठी आणि बागायती क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या १० एच.पी. किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या सौर पंपांचा पर्याय योजनेत समाविष्ट करावा.जोपर्यंत महावितरण यावर ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा आणि कराड या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा असंतोष कायम राहील. शासनाने तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तर आम्ही स्वस्थ बसणार नाही
“जब तक न होगा समाधान, तब तक जारी रहेगा यह संग्राम।”.या भागातील समस्या वेगळ्या आहेत,डोळ्यासमोर पाणी असून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार नसेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा
स्वप्नील गायकवाड यांनी घेतला आहे.