
शेतकऱ्यांनो, तांत्रिक बाबी वापरा! कृषी विभागाने केले आवाहन; यंदा कमी पावसाच्या अंदाज
भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या हवामान अंदाजानुसार संपूर्ण देशात एकूण पावसाचे प्रमाण सरासरीच्या ९२ टक्के असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा हवामान अंदाज असून यावर्षी मान्सून १०-२० जूनदरम्यान महाराष्ट्रात दाखल होणार आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, ख. भुईमूग, मूग, उडीद, तीळ, मका तसेच इतर तृणधान्य व गळीतधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी तांत्रिक बाबींचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. खरीप पिकांची पेरणी किमान ८० ते १०० मिमी प्रभावी पाऊस झाल्यानंतरच करावी. अपुरा पाऊस झालेल्या स्थितीत घाईने पेरणी केल्यास उगवण व पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – AI)
रखरखत्या उन्हातही शेती मशागतीची कामे! मान्सूनची चाहूल; संकटांचा सामना करत बळीराजाने कंबर कसली
सोयाबीन पिकांच्या लवकर येणाऱ्या जेएस-९३०५ सारख्या कमी कालावधीतील वाणांची बीबीएफ पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीमुळे पावसातील खंडाच्या परिस्थितीत जमिनीमध्ये आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. तूर पिकासाठी बीडीएन-७१६, भीमा, आश्लेषा व गोदावरी यासारख्या वाणांची निवड करावी. कापूस पिकासाठी कमी कालावधीतील व अतिघन लागवडीस अनुकूल वाणांचा अवलंब करावा. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी सलग तूर, मका व सूर्यफूल यासारख्या पिकांची लागवड करण्यास प्राधान्य द्यावे.
जिरायती क्षेत्रामध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. सोयाबीन तूर, कापूस-तूर अशा आंतरपीक पद्धतींमुळे जोखीम कमी होऊन उत्पादन स्थिर राहण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी घरगुती पद्धतीने बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. यासाठी १०० बिया ओलसर कागद अथवा तागाच्या पोत्यामध्ये १० लाइनमध्ये ठेवून पाणी टाकून ६ ते ७दिवस गुंडाळी करून थंड सावलीत ठेवावे. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त बियाणे उगवले असल्यास ते बियाणे पेरणीस योग्य समजावे. जिल्हा मृदा चाचणी व सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील जमिनीत नत्र व स्फुरद या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकासाठी शिफारसीय अन्नद्रव्य मात्रा एनपीके किलो एकरी तर तूर पिकासाठी युरिया २२, सिंगल सुपर फॉस्फेट १२५ तर म्युरेट ऑफ पोटॅश-२१ सरळ खतेकिलो/एकर आवश्यक आहे.
जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग आणि जैविक मल्चिंग करणे आवश्यक आहे. पिकाची कोळपणी करून पिकाच्या बुच्याशी मातीची भर द्यावी जेणेकरून ओलावा टिकून राहील. कापूस, तूर, मका, सूर्यफूल पिकांचे रोपे दाट असल्यास विरळणी करून संख्या मर्यादित ठेवावी. शेताच्या बांधावर शेवरी व सुपरनेपियर या वारा प्रतिरोधक झाडांची लागवड करण्यात यावी. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे ताण पडल्यास पिकाचा ताण कमी करण्यासाठी १०० लिटर पाण्यात २ किलो युरिया किंवा २ किलो डीएपी खताची फवारणी करावी. फळझाडे, भाजीपाला, तेलबिया व अन्नधान्य पिकांवर कमी पाऊस असल्यास पाण्याचा ताण पडणे रोखण्यासाठी केवोलिन ८ टक्के ची फवारणी किंवा पोटॅशियम नायट्रेट दोन टक्के ची फवारणी शेतकरी बांधवांनी केल्यास फायदेशीर ठरते. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व स्थानिक कृषि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार शास्त्रोक्त पद्धतीने खरीप हंगामाचे नियोजन करावे तसेच नियोजन करतांना कृषी विभागाच्या महाविस्तार ए. आए. अॅपचावापर करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी कळविले आहे.
खतावरील खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांनी लिक्विड कन्सोर्शिया जैवखताची १० मि.ली. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे वातावरणातील नत्र २० ते ४० किलो, जमिनीतील स्फुरद १० किलोपर्यंत व पालाश २० किलोपर्यंत पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते.तसेच मायकोरायझा जैवघटकामुळे मुळांची वाढ सुधारून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकामार्फत शोषण वाढते. लिक्विड कन्सोर्शिया जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा, सेलू येथे विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची विक्री किंमत ४०० रुपये प्रति लिटर आहे.